
India Pakistan Match Called Off: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेतील पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्धचा सामना रद्द होण्यापूर्वीच, भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन याने या सामन्यात सहभागी न होण्याचा निर्णय आयोजकांना कळवला होता आणि त्यांनतर रविवारी (दि. २० जुलै) पहाटे हा सामना अधिकृतपणे रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली.
या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले. यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर, सुरेश रैना, युसूफ पठाण, इरफान पठाण आणि हरभजन सिंग यांसारख्या अन्य भारतीय खेळाडूंनीही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतल्याच्या बातम्या आल्या. यानंतर शिखर धवनने स्वतःची भूमिका स्पष्ट केली. धवनने WCL च्या आयोजकांना पाठवलेल्या ईमेलचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करत सांगितले की, त्याने दोन महिन्यांपूर्वीच, म्हणजेच ११ मे रोजी, पाकिस्तानविरुद्धचा सलामीचा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता. "जो निर्णय ११ मे रोजी घेतला, त्यावर मी आजही ठाम आहे. माझा देश माझ्यासाठी सर्व काही आहे आणि देशापेक्षा मोठे काहीही नाही," असे धवनने 'एक्स' पोस्टमध्ये लिहिले.
धवनने पाठवलेल्या मेलमध्ये स्पष्टपणे नमूद केले होते की, "आगामी WCL लीगमध्ये मी पाकिस्तान संघाविरुद्धच्या कोणत्याही सामन्यात सहभागी होणार नाही." ११ मे २०२५ रोजी फोन आणि व्हॉट्सॲपवर झालेल्या चर्चेत हा निर्णय आधीच कळवण्यात आल्याचेही त्यात म्हटले होते. भारत-पाकिस्तानमधील सध्याची भू-राजकीय परिस्थिती आणि तणाव लक्षात घेऊन धवन आणि त्याच्या संघाने विचारपूर्वक ही भूमिका घेतल्याचेही पत्रात स्पष्ट केले होते
WCL च्या आयोजकांनी भारतीय क्रिकेटपटूंच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली. त्यांनी सांगितले की, पाकिस्तान हॉकी संघ यावर्षी भारतात येणार असल्याची आणि भारत-पाकिस्तान व्हॉलीबॉल सामना तसेच इतर खेळांमधील स्पर्धा पाहून, त्यांनी WCL मध्येही हा सामना सुरू ठेवण्याचा विचार केला, जेणेकरून जगभरातील चाहत्यांसाठी आनंदाचे काही क्षण निर्माण होतील. मात्र, या प्रक्रियेत नकळतपणे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे आणि देशासाठी गौरव मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना त्रास झाल्याचे त्यांनी कबूल केले. त्यामुळे, त्यांनी भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.
या WCL २०२५ स्पर्धेसाठी इंडिया चॅम्पियन्सने १५ खेळाडूंची निवड केली होती. यापैकी हरभजन सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण, युसूफ पठाण आणि शिखर धवन या ५ महत्त्वाच्या खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांच्या या भूमिकेला 'ऑपरेशन सिंदूर'चा संदेश म्हणून पाहिले जात आहे, जिथे दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशासोबत कोणतेही क्रीडा संबंध नकोत, असा सूर उमटला.
या खेळाडूंच्या बहिष्काराच्या भूमिकेमुळे भारतीय संघाचे प्लेइंग इलेव्हन तयार करणे अशक्य झाले. २० जुलै रोजी इंग्लंडमधील एजबेस्टन स्टेडियमवर होणारा हा सामना त्यामुळेच रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. स्टेडियम प्रशासनाने प्रेक्षकांना स्टेडियमवर न येण्याचे आवाहन केले असून, ज्यांनी तिकिटे खरेदी केली होती, त्यांना पैसे परत केले जाणार आहेत
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.