
INDIA bloc protest Delhi:केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आणि निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपांवरून इंडिया आघाडीचे नेते सोमवारी रस्त्यावर उतरले. संसदेपासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये २५ विरोधी पक्षांचे ३०० हून अधिक खासदार सहभागी झाले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी या मोर्चात भाग घेतला.
मोर्चादरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मत चोरल्याचा आरोप विरोधकांनी केला. बिहारमधील मतदार याद्यांच्या सुरू असलेल्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेवरही इंडिया आघाडीकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नेत्यांनी निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी केली आणि गैरप्रकार थांबवण्याची मागणी केली.
संसदेच्या मकर द्वारापासून निघालेल्या या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी मधेच अडवले. दिल्ली पोलिसांकडून या मोर्चाला पूर्वपरवानगी देण्यात आली नव्हती. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात होते. बॅरिकेड्स उभारून मोर्चाचे पुढे जाणे थांबवण्यात आले.
मोर्चा थांबवल्यानंतर काही अंतरावरच खासदारांनी ठिय्या देऊन आंदोलन सुरू केले. यावेळी तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले.
घोषणाबाजी
या मोर्चादरम्यान निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. “लोकशाही वाचवा” अशा आशयाचे फलक नेत्यांच्या हातात होते. संसदेपासून काहीच अंतरावर मोर्चा रोखल्यामुळे आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आणि “जनतेचा आवाज दाबला जात आहे” असा आरोप केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.