
२०२५ च्या आशिया कपमध्ये भारतीय संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. भारताने पाकिस्तानला गट फेरीसह सुपर-४मध्ये पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला असून रविवारी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान अंतिम सामना होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. हा मुद्दा सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असताना काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी आपले मत स्पष्ट केले आहे.
शशी थरूर यांचे मत
थरूर यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, "माझ्या मते, जर आपल्याला पाकिस्तानविरुद्ध इतकी तीव्र भावना असेल तर आपण खेळायलाच नको होते. पण एकदा आपण त्यांच्याशी खेळण्याचा निर्णय घेतला, तर खेळाडूप्रमाणे क्रीडाभावनेने खेळायला हवे होते. त्यात हस्तांदोलन करणे अपेक्षित होते."
ते पुढे म्हणाले, "१९९९ मध्ये कारगिल युद्ध सुरू असतानाही भारताने इंग्लंडमध्ये पाकिस्तानविरुद्ध विश्वचषक सामना खेळला आणि त्यावेळीही खेळाडूंनी हस्तांदोलन केले होते. कारण क्रीडाभावना ही राजकारण किंवा युद्धभावनेपेक्षा वेगळी असते. आज जर पाकिस्तानी खेळाडूंनी भारताविरुद्ध अपमानास्पद वर्तन केले असेल, तर ते दर्शवते की दोन्ही बाजूंकडून क्रीडाभावनेचा अभाव आहे."
थरूर यांनी मान्य केले की पाकिस्तानविरुद्ध भारतीय चाहत्यांच्या भावना स्वाभाविक आहेत. परंतु, त्यांनी ठामपणे सांगितले की क्रीडाक्षेत्रात या भावना बाजूला ठेवून स्पर्धेला फक्त खेळाच्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. "दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रियांमधून खेळाडूभावाचा अभाव स्पष्ट दिसतो," असे ते म्हणाले.
गुरुवारी बीसीसीआयने आशिया कप सुपर-४ दरम्यान पाकिस्तानच्या खेळाडूंनी दाखवलेल्या अनुचित हावभावांविरोधात अधिकृत तक्रार नोंदवली आहे. यात साहिबजादा फरहान आणि हरिस रौफ या खेळाडूंचा समावेश आहे.
दरम्यान, भारताने आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध दोन्ही सामने जिंकले असून, भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान अंतिम सामन्याची क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.