
Himachal Mandi Landslide
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर अद्यापही सुरूच आहे. राज्यातील अनेक भागांत भूस्खलन, ढगफुटी आणि अचानक आलेल्या पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मात्र, या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर एक चमत्कारिक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंडी जिल्ह्यातील धरमपूर भागातील सियाठी गावात घडली.
३० जूनच्या मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास, या गावात भयंकर भूस्खलन झालं. परंतु या संकटाची चाहूल गावातील नरेंद्र यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर झोपलेल्या कुत्र्याला आधीच लागली. कुत्रा अचानक जोरात भुंकू लागला आणि घाबरल्यासारखे आवाज करू लागला.
नरेंद्र यांनी कुत्र्याच्या आवाजामुळे जाग येताच वर पाहिले, तेव्हा घराच्या भिंतींना मोठ्या भेगा पडलेल्या आणि घरात पाणी शिरत असल्याचे दिसले.
नरेंद्र यांनी तत्काळ घरातील सर्व सदस्यांना जागे केले आणि गावातील इतर लोकांनाही अलर्ट करत सर्वांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले. पावसाचा जोर इतका होता की कोणालाही त्यांच्या घरातील सामान उचलता आले नाही. सगळे लोक रिकाम्या हाताने घराबाहेर पडले आणि काही वेळातच गावात जोरदार भूस्खलन झाले. यात अनेक घरे जमीनदोस्त झाली. सध्या सियाठी गावात केवळ ४ ते ५ घरे शिल्लक असून उर्वरित घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कुत्र्याच्या सतर्कतेमुळे तब्बल २० कुटुंबांचे ६७ सदस्य बचावले. सध्या हे सर्वजण त्रिंबाला गावातील नैना देवी मंदिरात आश्रय घेत आहेत. मात्र, अशा भयानक घटनेमुळे अनुभवांनंतर अनेक गावकरी उच्च रक्तदाब, मानसिक तणाव आणि नैराश्यासारख्या समस्या भोगत आहेत.
सरकारने मदतीचा हात पुढे करत प्रत्येक पीडित कुटुंबाला १०,००० रुपयांची तात्पुरती आर्थिक मदत दिली आहे. त्याशिवाय आजूबाजूच्या गावांनीही अन्न, कपडे, औषधे आणि निवाऱ्याची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
हिमाचल प्रदेशात २० जूनपासून आतापर्यंत ७८ जणांचा मृत्यू झाला असून, यातील ५० जण पावसाशी संबंधित घटनांमध्ये दगावले आहेत. संपूर्ण राज्यात २३ पूर, १९ ढगफुटी आणि १६ भूस्खलनाच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. मंडी जिल्हा सर्वाधिक प्रभावित असून, येथे अद्याप १५६ रस्ते बंद आहेत.
हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी हिमाचलच्या १० जिल्ह्यांमध्ये अति सतर्कतेचा इशारा दिला आहे. अचानक पूर, दरडी कोसळणे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, सियाठी गावातील त्या कुत्र्याचे सतर्क वागणे संपूर्ण गावासाठी वरदान ठरले आहे. संकटाच्या काळातही प्राण्यांचे संवेदनशील वर्तन मानवाच्या जीवितासाठी कसे उपयुक्त ठरू शकते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.