Gujarat Election Result: 'या' 8 कारणांमुळे गुजरातमध्ये भाजपला मिळाला विक्रमी विजय

आपचे दिल्ली मॉडेल ठरले अपयशी, काँग्रेसने कोणती मोठी चूक केली?
Gujrat Election Result
Gujrat Election ResultDainik Gomantak

Gujarat Election Result: गुजरातमधील भाजपच्या ऐतिहासिक विजयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याशिवाय इतरही अनेक कारणे आहेत. भाजपला ही निवडणूक बाहेरचे विरूद्ध स्थानिक अशी करता आली. तसेच विकासाचे गुजरात मॉडेल आणि त्याला हिंदुत्वाची साथ असे पॅकेज भाजपने दिले, ते यशस्वी ठरले. भाजपच्या विजयात कोणते मुद्दे महत्वाचे ठरले, ते जाणून घेऊया.

1. बाहेरचे विरूद्ध स्थानिक

या निवडणुकीत भाजपला ही निवडणूक बाहेरचे विरूद्ध स्थानिक अशा मुद्यांवर वळवता आली. काँग्रेसकडे कोणताही स्थानिक चेहरा नव्हता. अरविंद केजरीवालही दिल्लीचे. त्यामुळे आप देखील मागे पडला. विशेष म्हणजे गतवर्षीपेक्षा कमी मतदान होऊनही भाजपने 52.5 टक्के मते मिळवली. भाजपने एकुण 157 जागा जिंकल्या आहेत.

2. मोदी लाट नव्हे, तर त्सुनामी

2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले. गुजरातला त्यांचा अभिमान वाटतो. मोदी हा गुजरातवासियांसाठी अभिमानाचा विषय आहेत. मोदींनी एकदा गुजरातमध्ये येऊन सांगितले की बस्स... गुजरातवासीयांसाठी तितके पुरेसे असते. मोदींनी यंदा अहमदाबाद येथे 54 किलोमीटरचा रोड शो केला. इतर तीन रोड शो, 31 सभा घेतल्या. मोदींनी जिथे प्रचार केले तिथे भाजपला 95 टक्के यश मिळाले.

3. भाजपची रणनीती

हिंदुत्व आणि विकासाचे पॅकेज भाजपसाठी महत्वाचे ठरले. भाजपची हिंदुत्वाची प्रयोगशाळा गुजरातपासून सुरू झाली होती. 2002 च्या दंगलीनंतर भाजपने हिंदुत्वाच्या मुद्यावरून 127 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 2003 व्हायब्रेंट गुजरात समिट सुरू केले. त्यातून विकासाचे नवीन गुजरात मॉडेल समोर आले. त्यानंतर राम मंदिर, तीन तलाक आणि कलम 370 हटविणे, या गोष्टी मोदी सरकारला पुरक ठरत गेल्या.

4. AAP चे दिल्ली मॉडल ठरले अपयशी

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत वीज माफी, मोफत उपचार आणि मोफत शिक्षण असे दिल्ली मॉडेल यशस्वी केले होते. पण त्याचा प्रभाव गुजरातमध्ये पडला नाही. याऊटल दिल्ली मॉडेल विरोधात भाजपने गुजरात प्राईड अशी जोड दिली.

5. आपच्या रणनीतीचा धुव्वा

आपच्या राजकारणाचा एक भाग म्हणजे गुजरात निवडणुकीद्वारे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवणे. या निवडणुकीत 13 टक्के मतांमुळे आपला तो दर्जा मिळणार होता.

6. आपमुळे कुणाचा फायदा, कुणाचे नुकसान?

2017 मध्ये काँग्रेसने 41 टक्के मते घेतली होती ती यंदा 28 टक्क्यांवर आली आहेत. तर आम आदमी पक्षाने पदार्पणातच 13 टक्के मते घेतली आहेत. भाजविरोधातील 41 टक्के मते ही काँग्रेस आणि आपमध्ये विभागली गेली आहेत.

7. निवडणूर रिंगणात AAP नसता तर?

भाजपला ऐतिहासिक 53 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे उर्वरीत सर्व मतदान एकाच विरोधी पक्षाला मिळाले असते तरी भाजपला सरकार बनविण्यात अडचण नसती. केवळ सीट्स घटल्या असत्या. 2017 मध्ये भाजपला 49 टक्के मते मिळाली होती.

8. काँग्रेसची सर्वात मोठी चूक...

काँग्रेसमध्ये गांधी कुटूंबीय प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून प्रचारापासून दूर राहिले. राहुल गांधींनी एका दिवसात केवळ दोन सभाच घेतल्या. स्थानिक नेते आणि स्थानिक पातळीवरील प्रचार हीच काँग्रेसची रणनीती होती. पण ती चुकीची ठरली. ग्रामीण भाग जो काँग्रेसचा गड मानला जात होता तिथेही काँग्रेसचा पराभव झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com