
बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. येथे वंदे भारत एक्सप्रेसने धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी पूर्णिया येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (GMCH) दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आलीय.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गा पूजा मेळाव्यातून परत येत असताना त्यांना जोगबनी-दानापूर वंदे भारत एक्सप्रेसने धडक दिली. ही घटना पहाटे ४:४० च्या सुमारास घडली. जोगबनी-पाटणा वंदे भारत एक्सप्रेस शहर आणि पूर्णिया जंक्शन दरम्यान जात होती.
पाच जणांना ट्रेनने धडक दिली. तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जीएमसीएच येथे पाठवण्यात आले आहे. पूर्णिया जंक्शन स्टेशन अधीक्षक मुन्ना कुमार यांनी घटनेची पुष्टी केली.
अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि स्थानिक पोलिसांना तात्काळ तैनात करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत आणि तपास सुरू करण्यात आला आहे.
जोगबनी-दानापूर वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन 17 डिसेंबर रोजी झाले. ट्रेन जोगबनी येथून पहाटे 3:25 वाजता सुटते, 4:50 वाजता पूर्णियाला पोहोचते आणि सहरसा, खगरिया, समस्तीपूर, मुझफ्फरपूर मार्गे प्रवास करते, दानापूर, पाटणा येथे सकाळी 11:30 वाजता पोहोचते.
बिहारमध्ये आठवडाभरात वंदे भारत एक्सप्रेसचा हा दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी, ३० सप्टेंबर रोजी सहरसा येथील हटियागछी रेल्वे क्रॉसिंगजवळ एका वृद्धाचा रेल्वेने धडकून मृत्यू झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.