
'जग बदल घालुनी घाव, सांगून गेले भीमराव' - असे म्हणत साहित्यातून क्रांती घडविणारे अण्णा भाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या खेडेगावात झाला. हे गाव कासेगावपासून तीन मैल अंतरावरती आहे. अण्णाभाऊंचे मूळ नाव तुकाराम असे होते. अण्णाभाऊंचे मामा फकिरा ब्रिटिशांविरुद्धच्या बंडात सहभागी होते. साठे कुटुंबीय या संदर्भामुळे स्वातंत्र्यलढ्याशी जोडले गेले.
याबरोबरच संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये अण्णाभाऊंची डफावरची थाप आणि शाहिरी वाणी जनजागृती करीत होती. 'पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे' असे वक्तव्य करून पहिल्या दलित साहित्य संमेलनात त्यांनी दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व अधोरेखित केले होते.
लहानपणी त्यांनी गावच्या जत्रा, कुस्त्यांचे फड, तमाशे अगदी समरसून पहिले ज्यामुळे त्यांच्या लिखाणात सामान्य कष्टकरी वर्गाचे आणि ग्रामीण जीवनाचे दर्शन आढळते. त्यांनी फकिरा, चिखलातील कमळ अशा महत्वाच्या कादंबऱ्या,तसेच कथा, पोवाडे लिहिले आहेत. त्यांच्यावरती डॉ, बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्सच्या विचारांचा प्रभाव होता.
अण्णाभाऊंना गावच्या जत्रा पाहायला खूप आवडत असत. ते आपल्या मावसभावाच्या तमाशापार्टीसोबत फिरत असत. एकदा ते वाळवा तालुक्यातील रेठरे गावात तमाशा बघायला गेले होते. हा कार्यक्रम सुरु असताना रात्री तिथे क्रांतिसिंह नाना पाटील अनपेक्षितपणे आले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी तिथे लोकांना उद्देशून भाषण केले.
ते प्रेरणादायी भाषण ऐकून अण्णाभाऊ खूप प्रभावित झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा त्यांच्या मनावरती खोलवर परिणाम झाला. अण्णाभाऊ आपण समाजासाठी काय करू शकतो याचा विचार करू लागले. ब्रिटिशांविरुद्ध भारतीयांचा लढा सुरूच होता. अण्णाभाऊंचा निश्चय दृढ होत गेला. त्यांनी भूमातेच्या स्वातंत्र्यासाठी लढायचे ठरवले.
१९६१ साली अण्णाभाऊंना इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीने भेट देण्यासाठी रशियाला बोलावले, हा अण्णाभाऊंचा पहिला विमानप्रवास होणार होता. महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरु झाला. अण्णाभाऊंकडे बऱ्यापैकी पैसे जमले. अण्णाभाऊंच्या मित्रांनी त्यांना रशियात झोपड्या किती आहेत? तिथे किती लोक बेघर आहेत? तिथे बेकारी आहेत का? धर्म आहे का? वर्णद्वेष आहे का? हे पाहून यायला सांगितले.
हे सगळे अभ्यासताना अण्णाभाऊंनी अनेक नोंदी लिहून ठेवल्या आहेत. रशियन लोकांबाबत लिहिताना अण्णाभाऊ लिहितात त्यांना इतिहासाची जाण आहे, ते यंत्रांचे गुलाम नाहीत तर त्यांनी यंत्रानांच आपले गुलाम बनवले आहे. त्यांना शांतता आवडते पण याचा अर्थ ते कमजोर नाही आहेत.
ते कला-संस्कृतीबाबत सजग आहेत. रशियात फारसे गरीब दिसले नाहीत आणि तिथे स्त्रियांना पुरुषांइतकेच महत्वाचे स्थान समाजात आहे ही महत्वाची निरीक्षणे नोंदवून ठेवली आहेत. रशियादर्शन झाले नसते तर आयुष्यात मोठी पोकळी राहिली असती असेही अण्णाभाऊ पुढे म्हणतात.
Q1.अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कुठे झाला?
A1.अण्णाभाऊ साठे यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला
Q2.अण्णाभाऊ साठे यांची प्रसिद्ध कादंबरी कोणती आहे?
A2.फकिरा ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली प्रसिद्ध मराठी कादंबरी आहे.
Q3.अण्णाभाऊ साठे यांची जयंती कधी आहे?
A3. १ ऑगस्ट 1920 रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे.
Q4. अण्णाभाऊ साठे कोणत्या देशात गेले होते?
A4. अण्णाभाऊ साठे रशियामध्ये गेले होते.
Q5.अण्णाभाऊ साठे यांनी किती कादंबऱ्या लिहिल्या?
A5. अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.