Ajinkya Rahane: "टीम इंडियाला माझी गरज..." 159 धावांच्या धडाकेबाज खेळीनंतर अजिंक्य रहाणेने निवडकर्त्यांवर साधला निशाणा!
Ajinkya Rahane Ranji Trophy: टीम इंडियातून सध्या बाहेर असलेला अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जुलै 2023 मध्ये तो शेवटचा टीम इंडियाच्या जर्सीत दिसला होता. तेव्हापासून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, परंतु त्याला टीम इंडियात स्थान मिळत नाहीये.
रहाणे सध्या रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) मुंबई संघाचे नेतृत्व करत आहे. विशेष म्हणजे, त्याने नुकतेच छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात 159 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. या शतकी खेळीनंतर त्याने अप्रत्यक्षपणे निवड समितीवर निशाणा साधला. 'बॉर्डर-गावस्कर' मालिकेसाठी निवड न झाल्याबद्दल त्याने आपली नाराजी बोलून दाखवली.
शतकानंतर अजिंक्य रहाणे काय म्हणाला?
एका मुलाखतीत अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आपली निवड न होण्याबद्दल स्पष्टपणे सांगितले. तो म्हणाला, "वयामुळे नाही, तर खेळण्याच्या पद्धतीमुळे फरक पडतो. मायकल हसीने वयाच्या 30व्या वर्षी कसोटी पदार्पण केले, तरीही त्याने भरपूर धावा केल्या. रेड बॉल क्रिकेटमध्ये अनुभवाला खूप महत्त्व आहे."
रहाणेने आपला मुद्दा ठामपणे मांडत पुढे सांगितले, "मला वैयक्तिकरित्या वाटते की ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला माझी गरज होती आणि मी त्यासाठी तयार होतो. 34-35 वर्षांचे झाल्यानंतरही खेळाडू नेहमी चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. जर कोणताही खेळाडू रेड बॉल क्रिकेटबाबत गंभीर असेल, तर निवडकर्त्यांनी यावर नक्कीच विचार करायला हवा. ते स्टेडियममध्ये येऊन सामने पाहतात."
'चान्स' न मिळाल्याचा उल्लेख
रहाणेने निवडकर्त्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. तो म्हणाला की, अनुभवी खेळाडू असूनही निवड न होण्याबद्दल त्याच्याशी कोणतीही स्पष्ट चर्चा झाली नाही.
रहाणे पुढे म्हणाला, "मला वाटते की माझ्यासारख्या अनुभवी खेळाडूंना जास्त संधी मिळायला हव्यात. माझ्यासोबत कोणतीही चर्चा केली गेली नाही. मात्र मी सध्या माझ्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो आहे. ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला माझी गरज होती आणि मी त्या संधीसाठी पूर्णपणे तयार होतो."
रणजी ट्रॉफीत छत्तीसगडविरुद्ध कमाल
रणजी ट्रॉफीच्या 'ग्रुप डी' मध्ये मुंबई आणि छत्तीसगड यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात रहाणेने बॅटने कमाल केली. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस मुंबईने 8 गडी गमावून 406 धावा केल्या. रहाणेने 303 चेंडूंचा सामना करत 21 चौकारांच्या मदतीने 159 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. आपल्या या खेळीतून त्याने हे सिद्ध केले की, 37व्या वर्षीही तो टीम इंडियासाठी पूर्वीसारखाच दमदार खेळी खेळू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

