वळ्ळीपट्टण वेळीपांचे एक गाव

वेळीप हे बहुधा या प्रदेशातील सुरुवातीच्या स्थायिकांपैकी एक होते
Velip
Velip Dainik Gomantak

तेनसिंग रोद्गीगिश

Velip गोव्यातील काणकोण, सांगे आणि केपे तालुक्यांपासून कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील तिनई, सुपा, दिगी, उल्वी, बर्ची, कुंभारवाडा आणि हल्याळ तालुकापर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण प्रदेशात वेळीप समाजाची संख्या विपुल आहे.

कर्नाटकात त्यांना कोकण-कुणबी किंवा काडकुणबी म्हणतात; त्यांच्या कोकणी बोली भाषेवर स्थानिक बोली भाषांचा प्रभाव जाणवतो. गोव्यातील वेळीपांशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत.

वेळीप हे बहुधा या प्रदेशातील सुरुवातीच्या स्थायिकांपैकी एक होते. त्यांच्या वास्तव्याने प्रदेशाची व्याख्या केली आहे हे वळीवन या ठिकाणाच्या नावांवरून स्पष्ट होते, ज्याचा अर्थ वेळीप देश किंवा वेळीप जंगल, आणि वेळीपट्टण (वेळीप+पट्टण), म्हणजे वेळीप राहत असलेले शहर किंवा राजधानी.

बहुधा हे नाव वेळीप मोठ्या प्रमाणात राहत असलेल्या प्रदेशाला सूचित करण्यासाठी नंतर तिथे आलेल्या शिलाहार राजांनी दिले असावे. शिलाहार घरण्याच्या अकरा पिढ्या दक्षिण कोकणावर राज्य करीत होत्या. प्रथम त्यांची राजधानी चंद्रपूर (चांदोर) येथे होती. सणफुल्लाचा पुत्र धम्मियर याने बहुधा चंद्रपुरावर शत्रूचे आक्रमण झाल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर बलिपट्टण नगर स्थापून तेथे आपली राजधानी नेली.

ताम्रपटातील उल्लेखाप्रमाणे धम्मियर हा नामवंत राजा होता, ज्याने समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांप्रमाणे मोहक असलेल्या बलिपट्टणाची (आताचे खारेपाटण) स्थापना केली (श्लोक ९) (संदर्भ : मिराशी, १९७७ : कॉर्पस इंस्क्रिप्शनम इंडिकारम, खंड ६, १८२) १००८सालातील रट्टराजाच्या खारेपाटण ताम्रपटांतही (रत्नागिरी जिल्हा) बलिपट्टणाचा संदर्भ आहे.

पट्टणकुडी ताम्रपटात (बेळगावी जिल्हा) ९८८मध्ये बलिनगरातील अवसर द्वितीयच्या शासनाचा संदर्भ आहे: युधिष्ठिरासारखा सत्यशील अतुलनीय पराक्रमी आणि कामदेवासारखे सौंदर्य लाभलेल्या राजा अवसार द्वितीय आपल्या कार्याने येथे बलिनगरात आदरणीय बनला होता (श्लोक १५);

१०१०मधील शिलाहार ताम्रपटांचा आणखी एक संच आहे जो बलिपट्टण येथून रट्टराजाने जारी केला होता. ते प्रतिज्ञापूर्वक घोषणा करतात: महामंडलिका रत्नराजाच्या राज्यात वसलेल्या समृद्ध बलिपट्टणामध्ये, ज्याची कीर्ती सूर्य आणि चंद्राप्रमाणे वाढत आहे, अशा रट्टराजाने पाच महान मठाधिशांच्या रहिवाशांना एकत्र बोलावले आहे.

(श्लोक १३) (संदर्भ : मिराशी, १९७७ : कॉर्पस इंस्क्रिप्शनम इंडिकारम, खंड ६, १९१) यावरून हे सिद्ध होते की, बलिपट्टण हे राजधानी असलेले एक समृद्ध शहर होते. खारेपाट ताम्रपटांमध्ये चंद्रपुराचाही (चांदोर) संदर्भ आला आहे, ज्याचा उल्लेख बंदर असा केला आहे.

अर्थात हे नाव फार पूर्वीपासून प्रचलित आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी (सुमारे पहिले शतक) मध्ये नमूद केलेल्या बाजार शहरांच्या यादीत कल्याण आणि अंजदिव बेट (शॉफ, १९१२: द पेरिप्लस ऑफ द एरिथ्रेयन) यांच्यामध्ये वसलेले असे स्थान सापडते.

टॉलेमी (सुमारे दुसरे शतक ) त्याच्या जिओग्राफिया, पुस्तक ७ मध्ये बलिपट्टण नावाचे एक ठिकाण सूचीबद्ध करण्यात आले आहे. (संदर्भ : स्टीव्हन्सन, १९३२ : द जिओग्राफी ऑफ क्लॉडियस टॉलेमी, १४९)

सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे १००८च्या खारेपाटण ताम्रपटांवरून असे दिसते की बलिपट्टण खरोखरच गोव्यात होते. या ताम्रपत्रांंवर राजा रट्टराजाने अव्वेश्‍वराला समर्पित मंदिराला काही गावे दिल्याची नोंद आहे. ‘मी माझ्या आई-वडिलांच्या सन्मानार्थ आणि माझ्या स्वत:च्या आध्यात्मिक कल्याणासाठी दान केले आहे

- ज्येष्ठ पौर्णिमेला अव्वेश्‍वराची पंचगुण अर्पणांसह पूजा, ... (१) कुष्मांडी गाव, ज्याच्या सीमा पूर्वेला आहेत, दक्षिणेला मणिग्रामची पाणपोई, पश्चिमेला वापरवत गावाच्या रस्त्याने, सचांडलकपीठ गावाचा जलप्रवाह, आणि उत्तरेला क्षार (खारट) नदी (ही खाडी असावी).

(२) असनवीरा गाव; ज्याच्या पूर्वेला धारावाहल, दक्षिणेला कारापर्णी गावाची नदी, पश्चिमेला समुद्र आणि उत्तरेला गवहण गावाची नदी आहे. (संदर्भ : मिराशी, १९७७ : कॉर्पस इंस्क्रिप्शनम इंडिकारम, खंड ६, १९२) हे मंदिर बलिपट्टण आणि चंद्रपुराच्या जवळपास होते असा आमचा अंदाज आहे.

ताम्रपटांमध्ये नमूद केलेली गावे गोव्यातील सासष्टी आणि केपे तालुक्यांतील काही ठिकाणांच्या नावांशी जुळतात. कुष्माण्डी हे केपे शहराजवळ कुस्मणे असावे. मणिग्राम = आमोणो, क्षार-नदी = साळ नदी, असनविरा = असोळणा, कारापर्णी = कर्मावण = कर्मावण आता कार्मोणा गावाचा एक प्रभाग.

मिराशी स्पष्टपणे प्रतिपादन करतात की शिलाहार दक्षिण कोकणातील त्यांचे मूळ निवासस्थान गोव्याच्या प्रदेशात असावे, ज्याचा उल्लेख अनेक शिलालेखांमध्ये लंका किंवा सिंहला म्हणून केला गेला आहे. (संदर्भ : मिराशी, १९७७ : कॉर्पस इंस्क्रिप्शनम इंडिकारम, खंड ६, १८७)

Velip
कामेच्छा आणि धर्म

तत्कालानी चंद्रपूर हे आताचे चांदोर; जी भोज आणि कदंब यांची राजधानी होती आणि जी शेवटी शिलाहारांच्या ताब्यात गेली. वर्दे वालवलकर यांचे असे मत आहे की वर उल्लेख केलेला अव्वेश्वर हा सध्याचा चंद्रनाथ टेकडीवर पूजल्या जाणाऱ्या चंद्रेश्वराचा पूर्ववर्ती होता.

(संदर्भ : वर्दे वालवलकर, १९६२ : वळ्ळीपट्टणाचो सोद, ३०४) हे वळ्ळीपट्टण म्हणजे बहुधा सध्याचे केपे तालुक्यातील बाळ्ळी गाव असावे किंवा सासष्टी तालुक्यातील वेळ्ळी गाव असण्याची शक्यता आहे. शिलाहार त्यांना तेथे सापडलेल्या लोकांच्या नावावरून त्या ठिकाणाचे नाव देऊ शकतील का?

किलहॉर्नच्या मते, अव्वेश्वर हा शब्द अव्वा आणि ईश्‍वर हे शब्द एकत्र करून तयार झाला असावा. अव्वा म्हणजे कन्नड भाषेत आई आणि अंबेचा इश्‍वर, अंबापती म्हणजे शिव. त्यामुळे, अव्वेश्‍वर हे शिवाचे मंदिर असावे. (संदर्भ : कीलहॉर्न, १८९४ : खारेपाटण प्लेट्स ऑफ रट्टराज, एपिग्राफियाइंडिका, खंड ३, २९३).

Velip
गोव्याचा बहामनी सुभेदार महमूद गवाण

वेळीपही आईला अव्वा किंवा अव्वो म्हणतात. यावरून वेळीपांच्या लोकदेवतेचे केलेले हे वैदिक देवतीकरण आहे. वर्तमान चंद्रेश्वर, चंद्रनाथ असे त्याचे झालेले पुढील रूपांतर समजणे फारसे कठीण नाही, कारण तेदेखील शिवाचे नाव आहे.

शिलाहारांनी अव्वेश्वर म्हणून देवतेची पूजा केली, तर भोजांनी त्यांची कौटुंबिक देवता चन्द्रेश्वर म्हणून पूजा केली. टेकडीच्या माथ्यावरील मंदिर बहुधा अनेक वेळा पुन्हा बांधले गेले असावे; काही इतिहासकारांचा असा दावा आहे की या मंदिराचा जीर्णोद्धार रट्टराजाचे वडील अवसर तृतीय यांनी केला होता.

Velip
Margao: मडगावचे ख्रिस्ती हॉस्पिटल

जीर्णोद्धार करताना त्यांनी देवाचे नाव स्वतःच्या नावावर ठेवले किंवा त्याऐवजी त्याच्या स्वतःच्या नावाशी साधर्म्य साधण्यासाठी मूळ नाव बदलले किंवा अव्वेश्‍वर या देवाच्या नावावरून अवसर हे नाव घेतले असावे. दक्षिणेकडील राजवंशांमध्ये ही एक सामान्य प्रथा होती असे दिसते; होयसळ राजा विष्णुवर्धन याचे मूळ नाव बिटदेव होते.

तसेच त्याच्या आधी पूर्व चालुक्य वंशातील विष्णुवर्धन नावाचे दोन राजे होते. स्थानिक देवता विट, बिट किंवा विठ्ठल यांच्या नावांवरून बिट्टदेवोर, बिट्टिगावर, बिट्टरसादेरीव अशी नावे धारण करण्यात आली. (संदर्भ : ढेरे, २०११: द राइज ऑफ फोक गॉड, २४८)

अव्वेश्‍वराचा उगम समजून घेण्यासाठी वेळीपांनी ज्या मूळ देवतांची उपासना केली, त्या देवतांचा शोध घेणे आवश्यक आहे. सध्याच्या मंदिरातील गुहा असलेले आतील गर्भगृह, एका मोठ्या काळ्या दगडात कोरलेले आहे. ते बरेच जुने आहे असे दिसते आणि ते स्थानिक वेळीपांच्या देवाचे प्राचीन देवस्थान असू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com