निवृत्तीचा काळ म्हणजे 'फ्यूज्ड बल्ब'

हट्टी स्वभाव बदलला पाहिजे व कुठला तरी छंद जोपासत स्वत:ला गुंतवून घेतले पाहिजे. मग आपण निवृत्तीनंतरही प्रकाशमान राहतो, ‘फ्यूज्ड बल्ब’ होत नाही.
goa
goa Dainik Gomantak

रामदास केळकर

निवृत्तीचा काळ म्हणजे ‘फ्यूज्ड बल्ब’, हे वाक्य कुठेतरी कधी काळी वाचले होते. पण ते खरे आहे, हे अनेकांच्या अनुभवातून कळू लागले. तुम्ही भले हुशार असाल, तज्ज्ञ असाल; पण निवृत्त झाल्यानंतर कोणीही तुम्हांला विचारत नाही हे कटू सत्य पचवूनच पुढे जायला हवे.

नोकरी म्हटली की, निवृत्ती आलीच. ज्या ओव्या, शिव्या हाताखालचे कर्मचारी वाहतात ते ऐकण्याचे भाग्य निवृत्त झालेल्या व्यक्तीस लाभत नाही हे एका अर्थाने सुदैवच. निवृत्त झालेल्या माणसांबद्दल भरभरून बोलणारे तसे कमीच. अनेक माणसे निवृत्त झाल्यानंतरही हवीहवीशी वाटतात.

कारण त्यांचा परोपकारी स्वभाव. थोडक्यात काय तर, तुमचा स्वभाव निवृत्त होता कामा नये. त्यात बदल अपेक्षित असतो. हे काहींना जमते काहींना जमत नाही. काल परवा एका निवृत्त झालेल्या ज्येष्ठ गृहस्थाने, ‘निवृत्त झाल्याने घरात राहून कंटाळा येतो’ अशी आपली खंत चक्क सोशल मीडियावर व्यक्त केली होती.

याचा अर्थ ते व्यग्र नसावेत किंवा व्यग्र राहण्याची कला त्यांनी आत्मसात केली नसावी. कारणे काहीही असोत, हट्टी स्वभाव बदलला पाहिजे व कुठला तरी छंद जोपासत स्वत:ला गुंतवून घेतले पाहिजे, हे खरे!

छंदावरून आठवले, जर एखाद्याने लहानपणीच वा तरुणपणातच एखादा छंद जडवून घेतला तर त्याचा उत्तरकाळ चांगला जाऊ शकतो. अर्थात निवडलेला छंद कोणत्या प्रकारचा आहे, हेदेखील महत्त्वाचे असते.

अकोला येथील संगीततज्ज्ञ, गायक श्री. पाटील सांगतात की, गायनासारखे वा संगीतातील अन्य प्रकार हे निवृत्तीला उत्तम असे पर्याय आहेत. आता तर आजारातून मुक्तीसाठीदेखील संगीताचा उपयोग केला जातो. तुमच्या ज्ञानाचा, सेवेचा उपयोग केला जाईलच असे नाही. काही संस्थांमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा वापर करून घेतला जातो. तुम्ही विनामोबदला तो द्यायची तयारी ठेवायला हवी.

आपला देश जसे कुणी तक्रार केली तरच हलतो(त्यात तक्रार करणाऱ्या व्यक्तीला काळ्या यादीत टाकण्याची जास्त शक्यता); त्याप्रमाणे तुमचे नाव कुणीतरी सुचविण्यासाठी तुमचा संपर्क असायला हवा. याला ‘लॉबिंग करणे’ म्हणू शकता किंवा तुमच्या नावाची शिफारस व्हावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

एका मागणी असलेल्या व्यक्तीला त्याची मागणी असलेल्या कारणाचे रहस्य विचारले तर तो म्हणाला, ‘रक्कम मोजतो तेव्हा कुठे हे सोनेरी दिवस दिसतात’. हे रहस्य त्याला विचारायचे कारण म्हणजे त्याचा स्वभाव काही हवाहवासा वाटणारा नव्हता. हे त्या व्यक्तीला जवळून ओळखणाऱ्या प्रत्येकाला माहिती होते. असो शेवटी गाडी पैशावर आली म्हणायची! सर्वांनाच काही आर्थिक सबलता असते असे नाही.

पण, जरी आर्थिक सबलता नसली तरी परोपकार, दुसऱ्यांशी चांगले बोलणे आदी गोष्टी ठरवून करू शकता. एक गृहस्थ होते, ते परिचितांपैकी प्रत्येकाच्या वाढदिवसाला अभीष्टचिंतन स्वतः जाऊन करायचे.

अगदी सकाळी नाही जमले तरी त्या दिवशी जरूर जायचे. आता सोशल मीडियामुळे घरबसल्या किंवा आहे तेथून तुम्ही तुमच्या परिचयातल्या व्यक्तीचे अभीष्टचिंतन करू शकता. पण तेवढेही काहींना जमत नाही! ह्याला काय म्हणणार ? वास्तविक तो दिवस त्या व्यक्तीसाठी महत्त्वाचा असतो.

कदाचित पार्टी नाही म्हणून आपण दुर्लक्षित करत नाही ना? असो. सांगायचा मुद्दा एवढाच की जर ठरविले तर आपले निवृत्तीचे जीवन आनंदी जाऊ शकते. ह्यासाठी स्वभावातील बदल हवा आणि हो जे उपलब्ध तंत्रज्ञान असते त्याच्याशी जुळवून घेणे ह्याला प्राधान्य द्यायला हवे. तसेच नवीन पिढीकडे संपर्क ठेवता आला पाहिजे. तरच तुम्हाला कंटाळा येणार नाही व माणसात असल्यासारखे वाटेल.

goa
Bicholim Mine : डिचोली खाणपट्टा करार सरकारच्या अंगलट; गोवा फाऊंडेशनची आचारसंहिता उल्‍लंघनाची तक्रार

तुमची एकलकोंडी फुटेल. अर्थात अन्य उपायही आहेत जे तुम्हाला झेपू शकतात त्यात जरूर लक्ष घाला. गावचौकश्या करायच्या बंद केल्या तर अधिक चांगले.

कारण गाव तिथे भानगडी होणारच. तुम्ही जर सोडवू शकला तर अधिक चांगले; अन्यथा ‘तुका म्हणे उगी राहा जे जे होते ते पहा’ ह्या उक्तीप्रमाणे वागायला शिका. मग कंटाळा येणारच नाही व दुसऱ्यांनादेखील हा माणूस ‘फ्यूज्ड बल्ब’ नाही याची प्रचिती येईल ती वेगळीच!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com