

अजित जाधव, वाद्य कारागीर
Musical Instrument गोव्यात गणेश चतुर्थी जवळ आली की तबला, पेटी वगैरे वाद्यांच्या दुरुस्तीची लगबग सुरू होते. चतुर्थीच्या काळात घरोघरी होणाऱ्या भजनांना साथ देण्यासाठी ही वाद्ये योग्य स्थितीत हवी असतात.
अनेक वेळा काय होते तर, गणेशोत्सव आटोपला की भजनी मंडळे ही वाद्ये बंद करून ठेवून देतात. जर वाद्ये नित्य वापरात राहिली नाहीत तर त्यामध्ये समस्या उत्पन्न होऊ शकते. वाद्यांचा उपयोग रोज झाला तरच ती चांगल्या अवस्थेत राहतात.
त्यामुळे ती बंद करून ठेवणे योग्य नाही. गोव्यात खाऱ्या हवेचे प्रमाण अधिक आहे. त्याचाही विपरीत परिणाम वाद्यांवर होतो. तबल्याच्या चामड्याला पाणी सुटू शकते, त्याची शाई उडून जाते वगैरे. त्याशिवाय वादकांनी आपल्या वाद्यांना तेलाचा व पाण्याचा स्पर्श होता कामा नये ही देखील काळजी घेतली पाहिजे. तबला आणि पेटी या दोन्हींसाठी हे लागू आहे.
नवीन वाद्य विकत घेणाऱ्यांना माझा सल्ला असेल की वाद्य विकत घेताना चांगल्या दर्जाची वाद्येच विकत घ्या. अनेकदा शिकण्यासाठी म्हणून निम्न दर्जांची वाद्ये विकत घेतली जातात. ते योग्य नाही. योग्य साहित्य वापरून बनवलेले वाद्य मधुर वाजते व त्यातून गायकाला उभारी मिळते. त्याशिवाय डग्गा तांब्या-पितळीचाच असला पाहिजे.
तांबे, पितळ थंड असल्यामुळे चामड्याला मार बसत नाही. तबला लाल सिसम लाकडाचा बनलेला असावा. खैरी किंवा सिसमचे लाकूड तर सध्या मिळत नाही.
पेटी विकत घ्यायची असेल तर त्या पेटीचे अंग सागाच्या लाकडाचे असेल असे पहा. हलक्या लाकडाची पेटी टिकते कमी, त्याशिवाय त्यातून निघणाऱ्या स्वरांच्या सप्तकातही फरक पडतो.
चांगल्या साहित्यापासून बनलेली पेटीसारखी वाद्ये, जर त्यांची योग्य निगा राखली व त्यांचा सतत वापर केला तर पन्नास-पन्नस वर्षे टिकून राहिल्याचे उदाहरण आहे. म्हणून माझे म्हणणे हेच असेल की ही वाद्ये चांगल्या दर्जाचीच विकत घ्यावी व ती नेमाने वाजवावीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.