अनवट इतिहास : श्रीमंत बाजीराव पेशव्याचा गोव्यावर हल्ला

बाजीराव पेशवा (प्रथम) वाडीच्या सावंतवाडकर भोसलेंना बार्देशवर हल्ला करण्यासाठी दबाव आणत होते.
Bajirao Peshwa's attack on Goa
Bajirao Peshwa's attack on GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

फ्रान्सच्या राजाचे पोर्तुगीज राज्यातील दूत डोम लुइस दा कुन्हा यांना एरिकेराच्या चौथ्या काउंट, फ्रान्सिस्को झेवियर डी मेनेसेस यांनी लिहिलेल्या पत्रातून मराठ्यांनी पोर्तुगिजांवर बसवलेल्या दहशतीची कल्पना येते.

१८ मे १७४१ नंतर गोव्याचे नवीन पोर्तुगीज व्हाइसरॉय, डोम लुइस कार्लोस डी मेनेसेस, एरिकेराचे पाचवे काउंट त्याच्या पूर्ववर्ती व्हाइसरॉय पेद्रो दी मास्कारेन्हस, काउंट ऑफ सँडोमिल यांच्याकडून सत्ता ताब्यात घेण्यासाठी गोव्यात आला.

१७२०च्या दशकात पोर्तुगीज आणि मराठे यांच्यातील संबंध अचानक बिघडले होते. १७२०मध्ये पेशवा बाळाजी बाजीराव प्रथम यांनी मुघल साम्राज्याच्या तुटण्याचा फायदा घेतला आणि आक्रमक युद्धे सुरू केली.

१७३०च्या पहिल्या सहा महिन्यांत बाजीरावांनी, प्रामुख्याने उत्तरेकडील प्रदेशांमध्ये, मराठा साम्राज्याचा केला. हा विस्तार कोकण किनारपट्टीपर्यंतही पोहोचला.

१७३२पासून पोर्तुगीज आणि मराठ्यांमधील शांततापूर्ण संबंध अचानक जास्तच बिघडले होते पोर्तुगीज गोव्यातून बासीनला समुद्रमार्गे पाठवली जाणारी रसद रोखण्यासाठी मराठ्यांनी गोव्यावरच हल्ला केला.

दादाजी भावे नुरगुंकर, व्यंकटराव घोरपडे आणि जिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पेशवे बाळाजी बाजीराव प्रथम यांच्या सैन्याने घाट ओलांडला आणि प्रदेशावर मोठ्या प्रमाणात हल्ला सुरू केला. ( संदर्भ: म्हामाई, १९८४).

Bajirao Peshwa's attack on Goa
मर्मवेध : स्वैराचार..!

वाडीचे सावंतवाडकर भोसले (सावंतवाडकर भोसले घराण्याचे इतर सदस्य, रामचंद्र सावंत भोसले आणि जयराम सावंत भोसले) बार्देशच्या प्रदेशासह सरहद्दीवर, म्हणजे पोर्तुगीज आणि मराठ्यांच्या प्रदेशात राज्य करत होते.

मराठ्यांनी त्यांच्या बासिन मोहिमेचा भाग म्हणून सासष्टीवर हल्ला केला तोपर्यंत रामचंद्र सावंत भोसलेचे पोर्तुगिजांशी चांगले संबंध होते. १६ फेब्रुवारी १७३९ रोजी पोर्तुगीज व्हाइसरॉय सँडोमिल यांनी सावंतवाडकरांना पाठवलेल्या आभार पत्रावरून हे लक्षात येते.

सावंतवाडकर भोसलेंना वारंवार पोर्तुगीज राजवटीचे (१६९९, १७१२, १७२६, १७३६) जमीनदार म्हणून घोषित करण्यात आले होते.

ज्या आपत्तीजनक परिस्थितीत पोर्तुगीज सापडले होते, त्या स्थितीत बाजीराव पेशवा (प्रथम) वाडीच्या सावंतवाडकर भोसलेंना बार्देशवर हल्ला करण्यासाठी दबाव आणत होते. त्यांच्या दबावामुळे सावंतवाडकर भोसल्यांनी पोर्तुगिजांसमोर आपल्या मागण्या ठेवण्यास सुरुवात केली.

खोर्जुवा आणि पानेली ही गोव्याची बेटे सोडावीत आणि त्यांना १,००० रुपये वार्षिक खंडणी देण्यापासून सूट देण्यास सहमती द्यावी, अशा मागण्या होत्या. पोर्तुगिजांनी या मागण्या मानल्यास बाजीराव पेशव्याच्या हल्ला करण्याच्या आदेशाचे उल्लंघन करू, असेही त्यांनी कळवले.

कदाचित, आपल्याला हवे ते पदरात पाडून घेण्याची ही एक चाल असू शकते, पण या सगळ्या सावंतवाडकरांच्या मागण्या पोर्तुगिजांनी फेटाळल्या. (संदर्भ : म्हामाई, १९८४).

पोर्तुगिजांशी वाटाघाटी चालू असतानाच सावंतवाडकर भोसल्यांनी आपले सैन्य हळर्ण येथे एकत्रित करण्यास सुरुवात केली.

याची पूर्वसूचना मिळाल्यानंतरही, गोव्यातले पोर्तुगीज व्हाइसरॉय व सरकार बार्देश प्रांताचे रक्षण करण्याच्या आणि भोसल्यांच्या हल्ल्यापासून बचाव करण्याच्या स्थितीत नव्हते.

गोवा आणि बासीनमधील सर्व सीमांचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगिजांकडे साठ ग्रेनेडियर्सची फक्त एक कंपनी आणि सामान्य पायदळाची एक कंपनी होती. (संदर्भ: म्हामाई, १९८४)

त्यामुळे, पोर्तुगीज ज्या वेळी उत्तरेकडील बासिनचे रक्षण करत होते, त्याचवेळी सावंतवाडकर भोसल्यांच्या सैन्याने ५ मार्च १७३९च्या पहाटे गोव्याच्या बार्देशवर हल्ला केला आणि १२ मार्च १७४० रोजी खोर्जुवे बेटासह सर्व बार्देश प्रांत ताब्यात घेतला.

आग्वाद आणि रेइशमागुश किल्ला वगळता सर्व किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. व्हाइसरॉय सँडोमिल यांनी ही परिस्थिती सुधारण्याचा व स्वत:चा बचाव करण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांनी सावंतवाडकरांचे विरोधक नागोबा सावंत भोसले, त्यांचे भाऊ रामचंद्र सावंतवाडकर भोसले आणि त्यांचे पुतणे जयराम सावंतवाडकर भोसले यांच्याशी युती करण्याचा प्रयत्न केला.

परंतु या युतीमुळे सर्व भोंसल्यांचा रोष त्यांच्यावर ओढवेल हे त्यांनी लवकरच ओळखले. त्यामुळे त्यांनी नागोबा आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात शांतता करार करण्याला प्राधान्य दिले. या तहानुसार, पोर्तुगिजांनी पनेली बेटाच्या बदल्यात पीर्ण हे गाव भोसल्यांना दिले आणि सावंतवाडकरांना गरज लागेल तेव्हा तोफगोळे देण्याचे वचन दिले.(संदर्भ: म्हामाई, १९८४).

पोर्तुगिजांनीही मराठा सरदारांशी सर्व व्यवहारात इंग्रजांची मध्यस्थी मागितली आणि त्यांना साक्षीदार ठेवले. परंतु, इतके करूनही मराठ्यांविरुद्ध लढताना आवश्यक सामग्रीचा अभाव असल्याने व्हाइसरॉयवर बऱ्याच मर्यादा पडल्या. म्हणून पोर्तुगीज व्हाइसरॉय काउंट ऑफ सँडोमिलसमोर युरोपमधून सैन्याच्या आगमनाची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. (संदर्भ :पिसुर्लेकर,१९७५).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com