गोव्याच्या भूमीत बहरल्या चौसष्ठ कला

मास्टर दत्ताराम यांच्यासारखे नटश्रेष्ठ गोव्यात जन्मले.
Blog on Goa
Blog on GoaDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. व्यंकटेश हेगडे

या माझ्या गोव्याच्या भूमीत चौसष्ठ कला बहरलेल्या लता दीदींसारख्या गायिका जन्मल्या. मास्टर दत्ताराम यांच्यासारखे नटश्रेष्ठही येथे जन्मले. मडगाव ही गोव्याची सांस्कृतिक राजधानी आणि मडगावचे श्रेष्ठ कवी दामोदर अच्युत कारे यांचा वारसा सांगणारे कवी दाम्पत्य स्व. अशोक बोरकर आणि कविता बोरकर. चांगली कविता नीरवतेतून येते, कुणाच्या तरी सृजनशीलतेतून येते. चौसष्ठ कलांमधली ही कठीण कला शब्दांच्या श्रीमंतीतून येते. श्रेष्ठ मन:शांतीतून येते. अंतरात घुसमटणारं एखादं जीवनाविषयीचं तत्त्वज्ञान गोंडस शब्दांचे वस्त्रालंकार लेवून येते, पूूर्वजन्मीच्या वैभवातून येते. एखादा अर्जुन शक्ती, बुध्दी, कर्तव्य, ज्ञान, कार्यक्षमता, चातुर्य आणि धनुर्विद्येत पारंगत होण्यासारखी प्रचंड प्रज्ञा असूनही भर रणांगणावर गोंधळतो, तेव्हा भगवान श्रीकृष्णालाही गीता कवितेसमान येते. आजही मानवजातीला कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देणारी भगवद्‍गीता कविता रूपात आली.

Blog on Goa
लुईझिन यांचे उपाध्यक्षपद!

एक श्र्लोक मी ऐकलाय ‘येईल स्वयें श्री सरस्वती कवितारूप ती धरेल.’ माझ्या वैष्णवी या मुलीला ती 16-17 वर्षांची असताना अशा सहजसुंदर कविता यायच्या. तिला माहीत नसलेल्या भाषेतही यायच्या. हो.. कविता अशा या सृष्टीच्या पोकळीतूनही बहरतात. एखादी कविता आली अन ती लिहून झाली, कि एक वेगळी क्रियाशीलतेची, तृप्तीची भावना रंध्ररंध्रात बहरते, हा माझा अनुभव. ज्या चैतन्यात एखादी कविता बहरते ते चैतन्य श्रेष्ठ, तो कवीही श्रेष्ठ. आज हे लिहायचं कारण आमच्या मडगावातील स्व. अशोक बोरकर आणि कविता बोरकर या दाम्पत्याने सुरू केलेली काव्ययज्ञाची २०० वी काव्यमैफल आज, शनिवार 19 फेब्रुवारी रोजी साजरी होतेय. एखादी कविता येणे अन् तिचा अत्युच्च अनुभव अंतरात बहरणं, हा प्रसंगच साजरा करण्याजोगा आहे. अशोक-कविता या दाम्पत्याला वाटलं की, हा काव्याच्या सृजनशीलतेचा सोहळा घडवून आणावा म्हणून त्यांनी महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी मडगावच्या (Margao) गोमंत विद्यानिकेतनमध्ये काव्यमैफल घडवून आणली. त्यातून अनेक कवींना आपल्या कविता सादर करण्याची संधी मिळालीय. कविता स्फुरणे आणि ती सादर करणे, ती कुणाच्या तरी काळजात घुसून तिथून ‘व्वा’ अशी दाद मिळणं, हा एक सुंदर सोहळा. एखाद्या प्रतिमेला बहर येतो आणि सुंदर शब्दांचं योग्य यमक जुळवलं जातं.

Blog on Goa
जाणून घ्या जगाला चिकनपॉक्सची पहिली लस देणाऱ्या डॉक्टरांबद्दल

बाकीबाब म्हणायचे, ‘असं आतून सहज काहीतरी येतं, ते यमक जुळवूनच येतं, आनंदाचा खळखळता झराच येतो. मन उत्तेजित करणारं, धुंद करणारं येतं आणि योग्य दाद मिळाली कि जीवनातला दिवा सापडल्याचा आनंद होतो.’ या काव्यमैफलीत एक आपुलकी आहे. सर्वांनाच ती आपलीशी वाटते. तिथे कविता सादर करताना दर्जेदार कविताच सादर होते आणि या श्रेष्ठ उपक्रमाबद्दल रसिकांना व भाग घेणाऱ्या कवींनाही आयोजक बोरकरांबद्दल कृतज्ञता व आपुलकी वाटते.

कविता बोरकर यांनी तर आपल्या सुंदर कविता लिहिणाऱ्या पतीच्या (Husband) मृत्यूनंतरही हे आव्हान पेललं. एखादेवेळी आकाश कोसळलं, तरीही दबून न जाता आपल्या वेदनेतूनही काव्यशक्ती सांभाळावी, स्वत; दु:खात असतानाही अंग झटकून उठून सुखाच्या मशालीनं समाजात उजेड पडावा, हे दिव्य काम त्यांनी केले. खरे तर त्यांचा आदर्श अनेकांनी घ्यावा. मडगावचे सामाजिक व सांस्कृतिक केंद्र असलेल्या गोमंत विद्यानिकेतनने या कार्यक्रमाला रंगमंच देऊन सुंदर उपक्रमात आपला वाटा उचलला आहे. येथे कवी, कविता आणि कवितेचे दर्दी रसिक यांचा सुरेख संगम घडतो. आपुलकीच्या श्रेष्ठ नात्याने सगळे एकत्र येतात. अगदी तृप्त होऊन घरी जातात. पण कुणाला एखाद्या श्रेष्ठ कवितेतून उगमणाऱ्या जीवनाविषयीच्या तत्त्वज्ञानाचा साक्षात्कारही घडतो. कवितेतून सुंदर ज्ञान कुणाच्या अंतरात ज्ञानदिवाही पेटविते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com