पणजी: वाहतूक कोंडी नियंत्रणात आणायची असेल, तर एआय कॅमेरे आणि नव तंत्रज्ञानाच्या वापर करणे गरजेचे आहे. सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे, परंतु हे एआय कॅमेरे अपघात होणाऱ्या जागी, वाहतूक कोंडीच्या जागी उभारावेत. तसे न केल्यास हे एआय कॅमेरे केवळ महसूल गोळा करण्याचे साधन ठरतील, असे मत माजी पोलिस उपमहानिरीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी व्यक्त केले.
‘गोमन्तक’ टीव्हीवरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या सडेतोड नायक कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात माजी उपअधीक्षक सी. एल. पाटील यांनीही सहभाग घेतला होता. यावेळी ते म्हणाले, एआय कॅमेरा ही काळाची गरज आहे, परंतु या कॅमेऱ्यामुळे काही भागात वाहतूक कोंडी वाढली आहे याचे योग्य नियोजन गरजेचे आहे. गोवा हे पर्यटक राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर असतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या यंत्रणेची गरज आहे.
कारवाईत येईल पारदर्शकता- पाटील
पोलिस एखाद्या व्यक्तीला वाहतूक नियम मोडल्यावर दंडात्मक कारवाई करायचे, त्यावेळी अनेकजण दंड चुकविण्यासाठी राजकीय व्यक्तींना फोन करायचे, परंतु या यंत्रणेमुळे ऑनलाईन प्रक्रिया होईल. वाहनमालकांच्या मोबाईलवर कारवाईचा संदेश जाईल. त्यामुळे पारदर्शकता वाढेल. अनेक पर्यटक गोव्यातील पोलिस त्रास देत असल्याचा आरोप करतात, परंतु एआय कॅमेऱ्यांमुळे पर्यटक देखील जे नियम मोडतात त्यांच्यावर केलेल्या कारवाईत देखील पारदर्शकता येईल, असे सी. एल. पाटील यांनी सांगितले.
‘बंगळुरू, पुण्यातील कारवाईचा अभ्यास करावा’
राज्यात येणारे पर्यटक हे ‘रेंट कार’, ‘रेंट बाईक’ वापरतात. ज्यावेळी हे पर्यटक योग्यप्रकारे वाहने चालविणार नाहीत, वाहतूक नियमांचे पालन करणार नाहीत, त्यावेळी दंडाचे चलन वाहनमालकाला जाईल. त्यामुळे ही वाहने योग्य व्यक्तीलाच ‘रेंट अ बाईक’ व्यावसायिक देतील आणि वाहतुकीत सुधारणा व्हायला मदत होईल. त्यासोबतच अशाप्रकारे एआय कॅमेरे हे बंगळुरू, पुणे यासारख्या शहरात आहेत, तेथे कशा प्रकारे कारवाई करण्यात येते याचा अभ्यास देखील वाहतूक पोलिस, वाहतूक खात्याने करावा, असे सी. एल. पाटील यांनी सांगितले.
वाहतूक नियंत्रणासाठी इतर यंत्रणाही जबाबदार- जॉर्ज
राज्यातील अपघात का वाढले आहेत? कोणते रस्ते वाहतुकीसाठी घातक आहेत यावर काय उपाय केले पाहिजे याचा अहवाल वाहतूक पोलिसांकडून तयार केला जातो, परंतु या अहवालाची अमंलबाजवणी योग्यप्रकारे होणे गरजेचे आहे. केवळ वाहतूक पोलिसच वाहतूक नियंत्रणासाठी किंवा व्यवस्थापनासाठी जबाबदार नसतात, तर सार्वजनिक बांधकाम खाते, महानगरपालिका तसेच इतर यंत्रणांनी देखील आपली कर्तव्ये योग्यप्रकारे पार पाडली पाहिजेत, असे बॉस्को जॉर्ज यांनी सांगितले.
‘एआय कॅमेऱ्यांची यंत्रणा लाभदायक ठरेल’
सद्यस्थितीत पणजीत दिवसाऐवजी रात्रीची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. याचे एक प्रमुख कारण कॅसिनो आहेत. या वाहनांना पार्किंगसाठी जागा मिळत नाही. आपण आपल्या शहराच्या ‘कॅरिंग कॅपॅसिटी’चा विचारच करत नाही आहोत. ज्यावेळी आम्ही परदेशात जातो त्यावेळी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करतो. मात्र, गोव्यात मनमुराद वागतो. यावर नियंत्रण आणण्यासाठी एआय कॅमेऱ्यांची यंत्रणा लाभदायक ठरेल, असे बॉस्को जॉर्ज यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.