सिंधुदुर्ग: पावसाळा सुरू होताच आंबोली घाटात पुन्हा एकदा पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुख्य आकर्षण असलेल्या आंबोली धबधब्यावर मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल होत असतात. मात्र, आता वाढती गर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थानिक प्रशासनानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पावसाळ्यात धबधबा परिसरात दृष्यमानता कमी होत असल्याने आणि अपघातांचा धोका वाढत असल्यामुळे प्रशासनाने खालील उपाययोजना जाहीर केल्या आहेत. मुख्य धबधबा, हिरण्यकेशी, कावळेसाद आणि महादेवगड पॉईंट या ठिकाणी शनिवार आणि रविवार सायंकाळी ५ वाजल्यानंतर पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही.
सायंकाळी ५ वाजता परिसरात असलेल्या पर्यटकांना खाली उतरवण्यात येणार असून, त्या वेळेनंतर कोणालाही वर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. धबधबा परिसरातील सर्व स्टॉल्सही सायंकाळी ५ वाजता बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबोली घाटातील काही भागांत पावसामुळे धुके आणि पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे दृश्यमानतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी असलेल्या भागांमध्ये पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही.परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील आदेश वेळोवेळी दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, अशा सूचना स्थानिक पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना कोणताही अनुचित प्रकार किंवा धोका टाळण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.