ओरोस: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी हा जिल्ह्याला लागलेला मोठा शाप आहे; मात्र, यावर प्रभावी कारवाई होत नाही. सिंधुदुर्गात गुन्हेगारांना अभय मिळत आहे. याला पोलिस अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
जिल्ह्यात वाढती दारू तस्करी, अमली पदार्थांचा पुरवठा, गो-तस्करी, अवैध धंद्यांना मिळणारे कथित संरक्षण आणि पोलिस खात्यातील भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून राणे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्यावर जहरी टीका केली. जिल्ह्याचे मोठे नुकसान होत असून, पोलिस अधीक्षकांच्या बदलीची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि खासदारांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘पोलिस अधीक्षकांनी २२ मे २०२५ ला कार्यभार स्वीकारला. त्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात अपयश आले आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल असून, त्यातील अनेक प्रकरणांत दोषसिद्धीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. बहुतांशवेळा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर परिसरात कारवाई होते.’’
अमली पदार्थांविरोधातील कारवाईवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ड्रग्स पुरवठ्याची साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी आवश्यक तपास होत नाही. दोडामार्ग तालुक्यात रबर शेतीच्या नावाखाली गांजाची लागवड होत आहे. सुमारे १८०० हेक्टर क्षेत्र रबर लागवडीखाली असून, तेथे स्थानिकांनाही सहज प्रवेश मिळत नाही. पोलिसांनी त्या भागात विशेष मोहीम राबवावी, असा मुद्दाही त्यांनी मांडला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील काही अधिकाऱ्यांवरही राणे यांनी थेट आरोप केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.