Chhatrapati Shivaji Maharaj Forts In UNESCO World Heritage List
पुणे: महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या संघर्षाचे, त्यागाचे, पराक्रमाचे आणि शौर्याचे साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेले बारा किल्ले म्हणजे रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी, पन्हाळा, साल्हेर, खांदेरी, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, तसेच तामिळनाडूमधील जिंजी किल्ला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराजाच्या स्थापनेसाठी जे किल्ले भक्कम बुरुजांमध्ये बांधले, ते आजही इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. चला तर मग जाणून घेऊया या बारा किल्ल्यांविषयी.
शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ असून या किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे. गडावर शिवाई देवीचं मंदिर असून शिवाजी महाराजांचा जन्म झालेला कक्ष आजही जतन करण्यात आला आहे.
शिवनेरी किल्ल्यावर पोहोचण्यासाठी पायऱ्या चढून जावं लागतं. किल्ल्याची तटबंदी आणि गुहा अतिशय मजबूत असून येथे पाण्याचीही सोय आहे. शिवनेरी हा इतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा गड मानला जातो.
रायगड महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. १६७४ साली याच गडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. गडावर पोहोचण्यासाठी रोपवेची सुविधा असून पायथ्याशी पाचाड हे गाव आहे.
गडावरील राजवाडा आणि महाराजांची समाधी पर्यटकांचं विशेष आकर्षण असतं. रायगडाचा डोंगर अतिशय उंच असून या किल्ल्याची तटबंदी, बुरुज आणि वास्तुरचना अफाट बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे. रायगड किल्ला स्वराज्याचा केंद्रबिंदू मानला जातो.
राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वाधिक काळ राजधानी म्हणून वापरलेला किल्ला होता. याचे माजी, बुरुज, गुहा आणि दरवाजे उत्कृष्ट शौर्य आणि कुशल स्थापत्यशास्त्राचे प्रतीक आहेत. पद्मावती माची, संजीवनी माची आणि बालेकिल्ला हे राजगडाचे तीन मुख्य भाग आहेत.
शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया इथूनच रचला होता. तसंच याच ठिकाणी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाईंचं निधनही झालं होतं. ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेला राजगड किल्ला निसर्गसंपन्न असून इतिहासप्रेमींसाठी पर्वणीच आहे.
मालवण समुद्रात वसलेला सिंधुदुर्ग किल्ला हा पश्चिम भारतातील महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रातील एका बेटावर असलेला ऐतिहासिक किल्ला आहे. १६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची उभारणी केली.
गडावर शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर आहे. बुरुज, दरवाजे आणि जलसुरक्षा यासाठी किल्ला प्रसिद्ध आहे. हा किल्ला किल्ला मजबूत तटबंदी आणि बुरुजांसाठी प्रसिद्ध आहे.
साताऱ्याजवळ महाबळेश्वर रस्त्यावर वसलेला प्रतापगड इतिहासातील एका निर्णायक प्रसंगासाठी प्रसिद्ध आहे. याच गडावर १० नोव्हेंबर १६५९ मध्ये अफझल खानचा वध झाला होता.
छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाही सरदार अफझलखान यांची ऐतिहासिक भेट झाली, जिथे महाराजांनी वाघनघाच्या साहाय्याने अफझल खानाला ठार केले. किल्ल्यावर भवानीमातेचं भव्य मंदिर असून अफझल खानाची कबरही येथे पाहता येते.
कोल्हापूरजवळील पन्हाळा किल्ला हा मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा किल्ला होता. हा गड १० किलोमीटरपर्यंत पसरलेला असून येथील अंधारबावडी, राजदरवाजा, साजिरा आणि मजला बुरुज प्रसिद्ध आहेत.
शिवाजी महाराजांचा पन्हाळा ते विशाळगड दौडा हा प्रसंग इतिहासातील रोमांचक क्षण आहे. किल्ल्याची रचना अशी होती की, शत्रूपासून संरक्षणासाठी ते सुरक्षित ठेवता यायचे.
लोणावळ्याजवळ वसलेला लोहगड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील सर्वात सुंदर आणि सुलभ ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध गड आहे. लोहगड किल्ल्याची वास्तुकला त्याच्या भक्कम लष्करी बांधणी आणि कलात्मक शिल्पकलेत दिसून येते. किल्ल्यावर चार भव्य दरवाजे आहेत ते म्हणजे गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महा दरवाजा.
किल्ल्यावर मजबूत दरवाजे, गुहा, पाण्याच्या टाक्या, तटबंदी आणि सुंदर निसर्गदृश्य पाहायला मिळते. पावसाळ्यात धुक्याने व्यापलेला लोहगड अप्रतिम भासतो. १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.
साल्हेर हा नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात असून महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखला जातो. इथूनच सह्याद्री पर्वतरांग गुजरातच्या दिशेने सरकते. शिवाजी महाराजांच्या काळात मुघलांवर इथून मोठा विजय मिळवण्यात आला.
किल्ल्यावर जाण्यासाठी कठीण ट्रेक करावा लागतो. किल्ल्यावर बुरुज, गुहा, शिबिरे आणि जलव्यवस्थेचे अवशेष पाहायला मिळतात. साल्हेर हे ट्रेकर्ससाठी स्वर्ग आहे.
विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडजवळ असलेला सागरी किल्ला आहे. याचे बांधकाम सुरुवातीला शिलाहार राजवटीत झाले, मात्र नंतर शिवाजी महाराजांनी त्यात बदल करून ते भक्कम केले.
कान्होजी आंग्रे यांनी याचा प्रमुख सागरी तळ म्हणून वापर केला. समुद्रात ‘अंडरवॉटर वॉल’ (पाण्याखालील भिंत) असलेला हा एकमेव किल्ला आहे. हा किल्ला समुद्रातील लढायांसाठी बनवलेला उत्कृष्ट नमुना आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील हरनाईजवळ समुद्रात वसलेला सुवर्णदुर्ग हा लहान परंतु अत्यंत महत्त्वाचा जलदुर्ग आहे. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा वापर नौकादल वाढवण्यासाठी केला. किनाऱ्यापासून काहीशे मीटर अंतरावर असलेला हा किल्ला होडीतून जावा लागतो. याची तटबंदी आणि रचना शत्रूपासून संरक्षणासाठी उत्कृष्ट आहे. यासोबतच किनाऱ्यावर असलेले गोवा आणि कनकदुर्ग याच्या सहाय्यक किल्ले आहेत.
खांदेरी हा रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळील समुद्रात वसलेला किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी १६७९ साली इंग्रज व सिद्दी यांच्या सागरी शक्तीचा मुकाबला करण्यासाठी हा किल्ला उभारला. खांदेरीवरील दीपगृह, पाण्याच्या टाक्या, आणि तोफखाना यामुळे हा किल्ला नौदलाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.
तमिळनाडूतील जिंजी किल्ला ज्याला स्थानिक भाषेत सेनजी किल्ला (Senji Fort) म्हणूनही ओळखले जाते, हा दक्षिण भारतातील सर्वात मजबूत आणि दुर्गम किल्ल्यांपैकी एक मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना महाराजांनी जिंजी किल्ल्यावर ताबा मिळवला. या किल्ल्याला राजगड आणि रायगडनंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.