मुंबई : गोलंदाजाने नो बॉल टाकल्यानंतर फलंदाजांना ‘फ्री हिट’ देण्यात येतो; मात्र ‘फ्री हिट’ऐवजी गोलंदाजांला दंड ठोठवावा, अशी सूचना भारताचे महान खेळाडू व सध्याचे समालोचक सुनील गावसकर यांनी केली आहे.
सुनील गावसकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये नो बॉलनंतर ‘फ्री हिट’ देण्याची कल्पना फेटाळून लावली. त्याऐवजी नो बॉल टाकणाऱ्या गोलंदाजांवर दंड आकारला पाहिजे, असे त्यांना वाटते. कोलंबो येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला विजयाची अधिक संधी होती; मात्र सोनल दिनुषाच्या झुंजार शतकामुळे भारताला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे हा कसोटी सामना अनिर्णित राहिला.
भारताने हा सामना जिंकला असता तर मालिका २-० अशी भारताच्या बाजूने राहिली असती. तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या आशा कायम राहिल्या असत्या; मात्र भारतीय गोलंदाजीतील नो बॉलची समस्या या कसोटीत चिंतेची बाब ठरली आहे.
रवींद्र जडेजाने या दोन सामन्यांच्या मालिकेत वारंवार नो बॉल टाकले. २०२१पासून त्याने ८८ पेक्षा जास्त नो बॉल टाकले आहेत. त्यामुळे भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी कसोटी क्रिकेटमध्येही नो बॉलनंतर ‘फ्री हिट’ देण्याचा विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. सारांश जैननेही दुसऱ्या डावात नो बॉल टाकले.
सामन्याचे चित्र बदलू शकते
सुनील गावसकर म्हणाले, की भारतीय गोलंदाजांनी टाकलेल्या नो-बॉलची बरीच चर्चा झाली. या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, कारण नो बॉलमुळे सामन्याचे चित्र बदलू शकते.
खेळातील काही गोष्टी पूर्णपणे खेळाडूंच्या नियंत्रणात असतात. फलंदाजाने योग्य पद्धतीने गार्ड घेणे आणि गोलंदाजाने नो बॉल न टाकणे या त्यापैकीच आहेत. गोलंदाजाने क्रीजच्या पुढे पाऊल टाकण्याचे कोणतेही कारण नाही. सामना सुरू होण्यापूर्वी गोलंदाज आपला रन-अप योग्य ठिकाणी निश्चित करण्यासाठी टेपने अंतर मोजू शकतात. त्यामुळे नो बॉल टाकण्याबाबत कोणतेही कारण किंवा सबब देता येणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.