2011 World Cup Dainik Gomantak
क्रीडा

WC 2011: कॅप्टनकूल, वानखेडे स्टेडियम अन् तो ऐतिहासिक षटकार..., पाहा भारत विश्वविजेता झालेला सुवर्णक्षण

Video: बरोबर 12 वर्षांपूर्वी भारताने वानखेडे स्टेडियवर विश्वविजयाचे स्वप्न पूर्ण केले होते.

Pranali Kodre

World Cup 2011: भारतीय क्रिकेट इतिहासात आजपर्यंत अनेक अविस्मरणीय घटना घडल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे 2011 सालचा वर्ल्डकप विजय. या ऐतिहासिक विजयाला आज (2 एप्रिल) 12 वर्षे पूर्ण होत आहेत.

साल 2011 मध्ये भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांमध्ये आयसीसीचा 10 वा वनडे वर्ल्डकप आयोजित करण्यात आला होता. या वर्ल्डकपमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघ आणि कुमार संगकाराच्या नेतृत्वातील श्रीलंकन संघ साखळी फेरी, उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीचा अडथळा पार करत अंतिम सामन्यात पोहचले होते.

भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 एप्रिल 2011 रोजी मुंबईच्या आयकॉनिक वानखेडे स्टेडियमवर अंतिम सामना होणार होता. हा वर्ल्डकप मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा अखेरचा वर्ल्डकप होता. त्यामुळे त्याला त्याच्याच घरच्या मैदानात वर्ल्डकप विजयाची भेट देण्यास भारतीय संघ उत्सुक होता, तर श्रीलंकन संघही जिद्दी होता.

जयवर्धनेचं शतक

नाणेफेक झाली आणि श्रीलंकेच्या कर्णधारानं प्रथम फलंदाजी निवडली. झहिर खानने सुरुवातीलच उपूल थरंगाला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले होते. त्यानंतर हरभजन सिंगने तिलकरत्ने दिलशानला बाद केलं. पण नंतर कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने या मित्रांची जोडी जमली.

या दोघांनी अर्धशतकी भागीदारीही केली. पण त्या वर्ल्डकपमधील भारताचा हिरो ठरलेला युवराज सिंग पुन्हा मदतीला धावला आणि त्याने ही धोकादायक जोडी तोडली. संगकारा 48 धावा करून बाद झाला. पण नंतर समनवीराने जयवर्धनेल साथ देण्यास सुरुवात केली. पण पुन्हा युवराजनेच समनवीराचा अडथळाही दूर केला. कपूगेदराला झहिरने बाद केले.

मात्र, तरी एका बाजूने जयवर्धने खेळत होता. कुलसेकरानेही त्याला 32 धावांची छोटेखानी खेळी करत चांगली साथ दिली होती. त्यामुळे श्रीलंकेने 240 चा आकडा सहज पार केलेला. पण कुलसेकरा धावबाद झाला. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या थिसरा परेराने अखेरच्या दोन षटकात आक्रमक पवित्रा घेतला आणि 9 चेंडूतच 22 धावा ठोकल्या. इकडे जयवर्धननेही त्याचं शतक पूर्ण केलं. त्याने 88 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकन संघाने 50 षटकात 6 बाद 274 धावा केल्या.

भारतासमोर 275 धावांचं आव्हान

श्रीलंकेनं भारतासमोर 275 धावांचं आव्हान ठेवलं होते. भारतासमोर श्रीलंकेचे मुथय्या मुरलीधरन, लसिथ मलिंगा असे दिग्गज गोलंदाज होते. मलिंगाने भारताला सुरुवातीलाच जबरदस्त धक्के दिले. त्याने विरेंद्र सेहवागला शुन्यावर आणि सचिनला 18 धावांवर बाद केलं. पण नंतर युवा विराट कोहलीने गौतम गंभीरला चांगली साथ देताना तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. या भागीदारीने भारताच्या डावाला स्थिरता मिळाली. मात्र, विराट 36 धावा करून बाद झाला.

यानंतर अचानक भारताचा कर्णधार धोनी इनफॉर्म युवराज सिंग ऐवजी फलंदाजी क्रमवारीत बढती घेत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. हा निर्णय भारतीय संघासाठी फायदेशीर ठरला. धोनी आणि गंभीर या दोघांची जोडी जमली. या दोघांनी बघता बघता श्रीलंकन गोलंदाजांवर वर्चस्व ठेवत शतकी भागीदारीही केली. ही भागीदारी सर्वात महत्त्वाची ठरली. विजय भारताच्या नजरेत येऊ लागला होता. भारतीय चाहत्यांना वर्ल्डकप दिसू लागला होता.

पण त्याचवेळी गंभीर 97 धावांवर असताना त्रिफळाचीत झाला अन् सर्वच चकीत झाले. गंभीरला परेरानं त्रिफळाचीत केले. त्यामुळे त्याची आणि धोनीची 109 धावांची भागीदारी तुटली. तो बाद झाला, तेव्हा भारताला 52 चेंडूत 52 धावांची गरज होती. गंभीर बाद झाल्यानंतर युवराज फलंदाजीला उतरला.

धोनीचा विजयी षटकार

अखेरीस धोनीने आक्रमक पवित्रा घेत मोठे शॉट्स खेळले. शेवटी 11 चेंडूत भारताला 4 धावांची गरज असताना धोनीने नुवान कुलसेकराविरुद्ध खणखणीत षटकार ठोकलं अन् भारताने वर्ल्डकप जिंकला. त्यावेळी भारताचे वनडे वर्ल्डकप जिंकण्याचे 28 वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले होते. सचिन सहाव्या प्रयत्नात वर्ल्ड चॅम्पियन झाला होता.

धोनीचा तो षटकार आजही आयकॉनिक षटकार मानला जातो. त्या सामन्यात धोनी आणि गंभीरने केलेली भागीदारी भारताच्या विश्वविजयासाठी महत्त्वाची ठरली. सामना संपला तेव्हा धोनी 79 चेंडूत 91 धावांवर नाबाद होता. युवराजने नाबाद 21 धावा केल्या होत्या. धोनीला अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

त्यावेळी भारत 1983 नंतर दुसऱ्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला होता. धोनी कपिल देव यांच्यानंतरचा भारताचा दुसरा वर्ल्डकप विजेता कर्णधार ठरला होता. आजही हा विश्वविजय विजय भारतीय क्रिकेट इतिहासातील सुवर्णक्षण म्हणून ओळखला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: आर्लेकर, आरोलकर मला घाबरलेत! माजी मंत्री बाबू आजगावकरांचा हल्लाबोल; आमदारकीचा वापर लुटीसाठी केल्‍याचाही आरोप

Mopa Airport Taxi Protest: मोपा टॅक्सी आंदोलन प्रकरणी आमदार सरदेसाईंसह 54 जणांवर गुन्हे दाखल; 15 जूनला चौकशीसाठी पाचारण

Goa Politics: 'प्रभाग आरक्षणाचे निकष स्पष्ट करा, अन्यथा कोर्टात खेचू' सरदेसाईंचा सरकारला इशारा; पालिका निवडणुकीत 'रडीचा डाव' खेळू देणार नाही

Vagator Drug Case: वागातोर ड्रग्ज मृत्यू प्रकरणी हणजूण पोलिसांची इंदूरवारी! तपासात सहकार्य न करणाऱ्या मित्रांच्या रक्ताचे घेतले नमुने; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

सायबर फसवणुकीचे मोठे सिंडिकेट उद्ध्वस्त! 77 कोटींच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश, 16 जणांच्‍या आवळल्‍या मुसक्‍या; गोव्‍यातून नऊजण ताब्‍यात

SCROLL FOR NEXT