Yuvraj Singh - MS Dhoni X/ICC
क्रीडा

Dhoni-Yuvraj: 'माही घनिष्ठ मित्र नाही, आमच्यात फक्त...', धोनीबरोबरच्या मैत्रीवर युवीचे खळबळजनक खुलासे

Pranali Kodre

Yuvraj Singh opened up on Friendship with MS Dhoni:

भारतीय क्रिकेट संघाकडून आत्तापर्यंत अनेक दिग्गज खेळाडू खेळले आहेत. त्यात माजी कर्णधार एमएस धोनी आणि अष्टपैलू युवराज सिंग या दोन खेळाडूंचेही नाव घेतले जाते. अनेकदा त्यांच्या मैत्रीबद्दलही चर्चा होते. या दोघांनी मिळून अनेक वर्षे एकत्र खेळताना भारताला अनेक विजयही मिळवून दिले आहेत. मात्र नुकतेच युवराजने धोनीबरोबरच्या मैत्रीबाबत खळबळजनक खुलासा केला आहे.

रणवीर अल्लाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना युवराजने धोनीबरोबरच्या नात्यावर भाष्य केले आहे. युवराजने म्हटले की 'मी आणि माही घनिष्ठ मित्र आहे. आम्ही क्रिकेटमुळे मित्र झालो होतो, आम्ही एकत्र खेळलो. माहीची लाईफस्टाईल माझ्यापेक्षा खूप वेगळी होती, त्यामुळे आम्ही कधी घनिष्ठ मित्र बनू शकलो नाही. आम्ही फक्त क्रिकेटमुळेच मित्र होतो.'

युवराज पुढे म्हणाला, 'तुमचा संघसहकारी तुमचा मैदानाबाहेरही चांगला मित्र असलाच पाहिजे, असं काही नसतं. प्रत्येकाची वेगळी लाईफस्टाईल, क्षमता असते. काही लोक काही विशिष्ठ लोकांसोबत वेळ घालवतात. मैदानातील प्रत्येकजण तुमचा चांगलाच मित्र असायलाच पाहिजे, असे काही नसते.'

'जर तुम्ही कोणताही संघ पाहिला, तर सर्व ११ खेळाडू एकत्र नसतात. काही चांगले मित्र होतात, काही नाही. पण जेव्हा तुम्ही मैदानात असता, तेव्हा तुमचे इगो बाजूला ठेवून मैदानात तुमचे योगदान द्यायला पाहिजे.'

युवी म्हणाला, 'जेव्हा मी आणि माही मैदानात जायचो, तेव्हा आम्ही १०० टक्क्याहून अधिक आमच्या देशासाठी योगदान द्यायचो. त्यावेळी तो कर्णधार होता आणि मी उपकर्णधार होतो. जेव्हा तुम्ही कर्णधार आणि उपकर्णधार असता, तेव्हा तुमचे निर्णय वेगळे असू शकतात. काहीवेळी त्याने घेतलेले निर्णय मला आवडत नव्हते, कधी मी घेतलेले निर्णय त्याला आवडत नव्हते. हे प्रत्येक संघात होते.'

त्याचबरोबर युवराजने असेही सांगितले की आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या अखेरच्या काळात धोनीनेच त्याच्यासमोर वास्तव ठेवले होते. युवराज म्हणाला, 'तोच एक व्यक्ती होता, ज्याने मला स्पष्ट सांगितले होते की निवड समीती आता तुझ्याकडे पाहात नाहीये. त्यावेळी मला वाटले की कमीत कमी मला त्यामुळे खरे चित्र तरी दिसले होते. हे २०१९ वर्ल्डकप स्पर्धेच्या अगदी आधीची गोष्ट आहे, हेच सत्य आहे.'

याशिवाय युवराजने धोनीची ती आठवणही सांगितली जेव्हा २०११ वर्ल्डकपमध्ये नेदरलँड्सविरुद्ध धोनीने दोन चेंडू कसे फक्त खेळून काढले होते, ज्यामुळे तो त्याचे अर्धशतक करेल.

युवराजने सांगितले, 'अशीही एक वेळ होती, जेव्हा धोनीला दुखापत होती आणि मी त्याचा रनर होतो. मला आठवते एकदा जेव्हा तो नव्वदीत खेळत होता आणि मी त्याला स्ट्राईक देऊन शतक करण्यासाठी मदत करत होतो. मला आठवते की त्याच्यासाठी मी दुसरी धाव घ्याला डाईव्ह केली होती, जेव्हा तो नव्वदीत होता.'

'जेव्हा मी वर्ल्डकपमध्ये फलंदाजी करत होतो, तेव्हा मी नेदरलँड्सविरुद्ध ४८ धावांवर होतो, तेव्हा २ धावा हव्या होत्या आणि त्यावेळी माहीने दोन्ही चेंडू खेळून काढले, जेणेकरून मी ५० धावा करू शकतो.'

दरम्यान, युवराज आणि धोनी ही भारतीय क्रिकेटमधील एक यशस्वी जोडी म्हणूनही ओळखली जाते. युवराजने त्याच्या कारकिर्दतील अखेरचा सामना २०१७ मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याने 2019 मध्ये भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तसेच धोनीने २०१९ च्या वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीत अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT