India vs Pakistan: टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील ज्या थरारक सामन्याची जगभर प्रतीक्षा आहे, त्या भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावर आता अनिश्चिततेचे काळे ढग दाटले आहेत. 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकण्याचे संकेत दिल्याने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली. या वादावर तोडगा काढण्यासाठी रविवारी (8 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, मात्र या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मांडलेल्या अटी आयसीसीने फेटाळून लावल्या. यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला असून मैदानावरचा हा महामुकाबला कागदावरच अडकतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
रविवारी झालेली ही बैठक तब्बल पाच तास चालली. यामध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी आयसीसीसमोर अनेक मागण्या ठेवल्या होत्या. पाकिस्तानने या महामुकाबल्यासाठी काही अटी घातल्या होत्या, ज्यात प्रामुख्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरु करणे आणि भारत-पाकिस्तान-बांगलादेश अशी त्रिकोणी मालिका आयोजित करणे यांचा समावेश होता. मात्र, आयसीसीने या मागण्यांना स्पष्ट नकार दिला. भारतासोबतच्या क्रिकेट संबंधांबाबत पाकिस्तानने घेतलेली ही आक्रमक भूमिका आणि आयसीसीने त्यांना दाखवलेला ठेंगा यामुळे 15 फेब्रुवारीचा सामना संकटात सापडला आहे.
या वादाचे मूळ बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या भूमिकेशी जोडलेले आहे. बांगलादेशने भारतात येऊन सामने खेळण्यास नकार दिल्यानंतर आयसीसीने त्यांना वर्ल्ड कपमधून बाहेर काढण्यासाठी मतदान घेतले होते. त्यावेळी पाकिस्तान हा एकमेव असा देश होता, ज्याने बांगलादेशला पाठिंबा दिला. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी 'बांगलादेशवरील अन्यायाचा' निषेध म्हणून भारताविरुद्धच्या महामुकाबल्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली.
आयसीसीवर पक्षपातीपणाचा आरोप करत पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला भारताविरुद्ध खेळण्याची परवानगी नाकारली. विशेष म्हणजे, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल हे देखील या वादात पाकिस्तानच्या बाजूने लाहोरमध्ये उपस्थित होते.
आयसीसीने आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला केवळ एका दिवसाचा अवधी दिला आहे. मोहसीन नक्वी यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी चर्चा करुन आपली अंतिम भूमिका मंगळवारी सकाळपर्यंत स्पष्ट करावी, असे निर्देश देण्यात आले. जर पाकिस्तानने आपल्या भूमिकेवर ठाम राहून महामुकाबल्यावर बहिष्कार टाकला, तर वर्ल्ड कपच्या प्रतिमेला आणि आर्थिक समीकरणांना मोठा धक्का बसेल. दुसरीकडे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपली भूमिका आधीच स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा पाकिस्तान सरकारच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. 15 फेब्रुवारीला मैदानावर सूर्यकुमार यादव आणि बाबर आझम आमनेसामने येणार की राजकीय पेचप्रसंगामुळे हा सामना रद्द होणार, याचे उत्तर येत्या 24 तासांत मिळण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.