पणजी: जिल्हा पंचायत निवडणुकीत ‘मगो’ सोबत युती करूनही भाजपला अपेक्षित यश मिळाले नसल्याचा मुद्दा भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्यासमोर मांडला.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मतांचे विभाजन टाळून विरोधी मते एकत्र येऊ नयेत यासाठी कोणती रणनीती आखता येईल, यावरही सविस्तर चर्चा झाली. संघटनात्मक बळकटी, कार्यकर्त्यांचे मनोबल आणि समन्वय सुधारण्याची गरज असल्याचे मत यावेळी अनेक नेत्यांनी व्यक्त केले.
राज्यात बुधवारी आयोजित ‘सागर मंथन’ कार्यक्रमाच्या निमित्ताने बी. एल. संतोष यांचे मंगळवारी गोव्यात आगमन झाले. त्याआधी त्यांनी मंगळवारी रात्री मंत्री, भाजप आमदार आणि कोअर समितीच्या पदाधिकाऱ्यांशी बैठका घेतल्या. बैठकीत उपस्थित मुद्द्यांची दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याचे संकेत बी. एल. संतोष यांनी दिल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने ‘गोमन्तक’ ला दिली.
हडफडे येथील रोमियो लेन क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू होण्याच्या घटनेचे पडसाद दिल्लीतही उमटले होते. त्यामुळे या घटनेबाबत बी. एल. संतोष मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी चर्चा करणार का, याकडेही अनेकांचे लक्ष होते. परंतु, मंत्री, आमदारांसोबतच्या बैठकीत संतोष यांनी यावर भाष्य केले नाही. बैठकीत त्यांनी केवळ संघटन वाढवण्यासह ते बळकट करण्यावरच भर दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.
गोव्यात सलग चौथ्यांदा भाजपला सत्तेवर आणण्यासाठी मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. वैयक्तिक मतभेद विसरून पक्षाला सत्तेवर कसे आणायचे याचाच विचार प्रत्येकाने करावा, जिल्हा पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांशी आलेला संपर्क कायम ठेवावा, ग्रामीण आणि शहरी भागांत राहणाऱ्या मतदारांच्या समस्या जाणून घेऊन त्या सरकारपर्यंत पोहोचवाव्या आणि अशा सर्व समस्यांवर पुढील वर्षभरात मात करावी, पक्षाला फटका बसेल अशा पद्धतीचे वर्तन कुणीही करू नये, अशा प्रकारचे कडक आदेशही संतोष यांनी दिला. उद्या संतोष हे आमदार व मंत्री यांची बैठक घेणार आहेत.
मंत्री, आमदार आणि कोअर समितीच्या बैठकीनंतर बी. एल. संतोष यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्वतंत्ररित्या बैठक घेतली. या बैठकीतही त्यांनी या दोन्ही नेत्यांसोबत आगामी पालिका आणि विधानसभा निवडणुकीबाबतच चर्चा केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी मुख्यमंत्र्यांना, तर जिल्हा पंचायत निवडणुकीत मिळालेल्या विजयाचा फायदा पालिका आणि विधानसभा निवडणुकीत मिळवण्याच्या दृष्टीने आतापासूनच प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाईक यांना दिल्याचेही सूत्रांनी नमूद केले.
१.गोवा कर्मचारी भरती आयोगामुळे कार्यकर्त्यांना सरकारी नोकरीची संधी मिळत नसल्याची खंतही संतोष यांच्यासमोर व्यक्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
२. मंत्री, आमदार आणि कोअर समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकांत संतोष यांनी २०२७ मध्ये राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर अधिक भर दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.