मुंबई: गेल्या जवळपास पंधरा वर्षापासून रखडलेल्या गोवा - मुंबई महामार्गाचे चौपदरीकरण केव्हा पूर्ण होणार? असा प्रश्न कोकणातील प्रवासी सातत्याने उपस्थित करतायेत. अनेक समस्यांमुळे महामार्गाचे काम रखडले आहे. याबाबत महाराष्ट्राच्या बांधकाम मंत्र्यांनी एक डेडलाईन दिल्यानंतर आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांनी महामार्गाचे काम केव्हा पूर्ण होणार याबाबत माहिती दिली आहे.
गोव्याचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी याबाबत अतारांकित प्रश्न विचारला होता. यावर मंत्री नितीन गडकरींनी लेखी उत्तर दिले आहे. गोवा - मुंबई चौपदरी महामार्गाचे काम येत्या सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती गडकरींनी दिली आहे.
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेत उत्तर देताना जानेवारी २०२६ पर्यंत मुंबई - गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते. महामार्गाला विविध कारणांमुळे विलंब झाल्याचे मान्य करताना कोसळलेल्या कामांसाठी कंत्राटदाराला जबाबदार धरुन दंड ठोठावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
गोवा - मुंबई महामार्ग गेल्या अनेक वर्षापासून रखडला आहे. महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे यांचा सामना करावा लागत आहे. शिवाय महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे संकट देखील जैसे थे आहे. यामुळे महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.