Water Shortage in Bardez : बार्देश तालुकावासीयांना एकीकडे पाणीसमस्येचा सामना करावा लागत असताना, मागील काही दिवसांपासून या परिसरामध्ये सध्या गढूळ व जाड पाण्याची समस्या जाणवत आहे. सध्या नागरिकांना पिवळसर पाणी नाईलाजाने प्राशन करावे लागत आहे. तर वितरण व्यवस्थेतील दोषामुळे अनेक भागांत पुरेसे व मुबलक पाणी पोहचत नाही, अशा ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
अस्नोडा प्रकल्पस्थळी विजेचीही समस्या असल्याने म्हापसा व बार्देशातील पाणीपुरवठ्यावर २ जुलैपासून परिणाम झालेला दिसत आहे. तसेच गढूळपणाची पातळी वाढल्याने प्रकल्पांमधील शुद्धीकरण प्रक्रियेवरही परिणाम झाला आहे. ज्यामुळे ग्राहकांना पाणी सोडण्यास विलंब होत आहे. परंतु, गेले दोन दिवस या स्थितीत किंचित बदल झालेला दिसत असून, म्हापसा शहरासह इतरत्र पाणीपुरवठा सुरळीत झाला असला तरी काही उंच भागात कमी पाणी दाबाचा प्रश्न आहे.
अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पास सध्या तिळारी धरणातून कच्च्या पाण्याचा पुरवठा होत आहे. अस्नोडा प्रकल्पात प्रक्रिया झाल्यानंतर हे पाणी ग्राहकांना पुरविले जाते. परंतु, अस्नोडा प्रकल्पात फिल्टरेशन प्रकल्प स्थापन झाल्यापासून तो अद्याप अद्ययावत केलेला नाही. यात सुधारणांची गरज आहे, असे अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचेही मत आहे.
तिळारीतून अस्नोडा प्रकल्पात येणाऱ्या कच्च्या पाण्यात माती अधिक. मातीमिश्रित पाण्यामुळे फिल्टरेशन प्रक्रियेत येतात अडचणी. परिणामी, पुरवठ्यावरही परिणाम होतोय, असे साबांखाच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे मत.
म्हापसा शहरातील आल्तिन परिसरात लोकांना सलग सहा दिवस पाणीसमस्येचा त्रास सहन करावा लागला होता. परिणामी, बुधवारी तेथील स्थानिक महिलांनी रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त केला होता. त्यानंतर, रात्री तासभरासाठी या भागांत पाणीपुरवठा झाला. परंतु, पाण्याचा दाब कमी असल्याच्या अजूनही येथील लोकांच्या तक्रारी आहेत.
ऐन पावसातही टॅंकरवरच भिस्त !
सध्यस्थितीत विविध भागांतील सोसायट्यांमध्ये टँकरचे प्रमाण कमी झाले आहे, मात्र तरीही टँकर पूर्णतः कमी झाले नसून सोसायट्यांना टँकरसाठी पैसे मोजावेच लागत आहेत. मुसळधार पाऊस पडत असूनही लोकांना पाणी समस्येचा सामना करावा लागत असल्याने लोकांनी प्रशासनाच्या पाणी नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गरजेहून मिळते कमी
बार्देश तालुक्यास १२० एमएलडी पाण्याची गरज. परंतु,प्रत्यक्षात मिळते ७५ ते ८० एमएलडी.पाण्याचे नियोजन करताना पाणी पुरवठा विभागाची होते कसरत. जलवाहिन्यांना सतत गळती, खोदकामात वाहिनी फुटण्याने पुरवठ्यावर परिणाम. म्हापशाला १६ एमएलडीची गरज; मिळते केवळ ९ एमएलडी पाणी.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.