पणजी: मतदार यादी ‘एसआयआर’ प्रक्रियेत दोन मतदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे हा विषय कायदा खात्याकडे पोचला आहे. त्यांच्याकडून सरकारी पद्धतीचे उत्तर आले तर केंद्रीय गृह मंत्रालयापर्यंत तो पोचण्याची शक्यता आहे.
सध्या मतदान केंद्र अधिकारी घरोघरी जाऊन ‘एसआयआर’अंतर्गत दिलेले अर्ज पत्रके भरून घेत आहेत. असे अर्ज भरून घेताना आपण भारतीय नागरिक आहोत का, अशी विचारणा दोन मतदारांनी केली. आपला जन्म पोर्तुगीज शासित गोव्यात झाला, जन्म नोंदही पोर्तुगालमध्ये झाली, त्यामुळे पोर्तुगीज ठरतो,असा त्यांचा दावा आहे.
आम्ही भारतीय आहोत, असे मुख्य मतदार अधिकाऱ्यांनी कळवावे आम्ही अर्ज पत्रक भरून देतो, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बुचकळ्यात पडलेल्या मतदार केंद्र अधिकाऱ्यांनी ही बाब संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. तेथून तो विषय जिल्हाधिकाऱ्यांकडे पोचला. तेथून मुख्य मतदार यादी अधिकारी कार्यालयातून याबाबत काय निर्णय घ्यावा, अशी विचारणा कायदा खात्याकडे करण्यात आली आहे.
कायदा खात्यात याविषयावर चर्चा सुरू आहे. तेथील काहींच्या म्हणण्यानुसार नागरिकत्वावर शिक्कामोर्तब करणे हे केंद्रीय गृह मंत्रालयाचे काम आहे. त्यामुळे त्या मतदारांचे नेमके नागरिकत्व कोणते हे केंद्रीय गृह मंत्रालयच ठरवू शकते, यावर त्यांनाच विचारणा करणे योग्य आहे, असे कायदा खात्याचे मत असू शकते. अद्याप कायदा खात्याने अधिकृतपणे तसे कळवलेले नसले तरी १० डिसेंबरपूर्वी त्यांना हा विषय हातावेगळा करावा लागणार आहे.
या दोघांनी अशी शंका उपस्थित केली असली तरी अशाच काही कारणास्तव अर्ज पत्रक भरून देण्यास आजवर १ हजार ८९४ जणांनी नकार दिला आहे. त्याबाबत त्यांनी कोणतेही कारण देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांचे काय करायचे हा मुख्य मतदार अधिकारी कार्यालयासमोर पेच निर्माण झाला आहे.
राज्यातील मतदारयादी सखोल पुनरावलोकन प्रक्रियेत त्यापैकी १० लाख ७२ हजार १७ अर्जपत्रकांचे संगणकीकरण पूर्ण झाले असून हे प्रमाण ९०.४६ टक्के आहे. मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी तपासणी पूर्ण केलेल्या अर्जपत्रकांची संख्या १० लाख ७१ हजार ३६६ असून तपासणीचे प्रमाण ९०.४१ टक्के आहे.
नोंदणी सुधारणा प्रक्रियेत गोव्याने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या संकेत प्रणालीवर उपलब्ध असलेल्या एस. आय. आर. २०२६ अहवालानुसार, राज्यात मतदार नोंदणीसाठी तयार केलेल्या सर्व ११ लाख ८५ हजार ३४ अर्जपत्रकांची प्रत छापून ते नागरिकांना वितरित करण्यात आले आहेत. राज्यातील सर्व १,७२५ स्थानिक अधिकाऱ्यांना यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि त्यांनी केलेले काम नियमितपणे नोंदवले जात आहे.
नागरिकांनी स्वतः भरून पाठविलेली पण अधिकाऱ्यांनी अद्याप तपासणी न केलेली अर्जपत्रके ६५१ इतकी असून त्यांचे प्रमाण केवळ ०.०५ टक्के आहे.
४ लाख ७६ हजार १२२ (४०.१८%)
स्वतःच्या नावावर नोंद झालेली
३ लाख ८० हजार ७०९ (३२.१३%)
संतती म्हणून नोंद झालेली
२ लाख १४ हजार ५३५ (१८.१०%)
नोंद न झालेली / जुळवाजुळव न झालेले
एकूण ९३
हजार २९७
नोंद न होऊ शकलेले अर्जपत्रक
प्रमुख कारणे :
मृत्यू : २४ हजार ७११ (२.०९%)
शोधूनही सापडले नाहीत / अनुपस्थित : २६ हजार ७२१ (२.२६%)
कायमस्वरूपी स्थलांतर :
३८ हजार २१६ (३.२२%)
आधीच नोंद असलेले :
१,७१३ (०.१४%)
इतर कारणे : १,८९६ (०.१६%)
निवडणूक सुधारणा कार्यात गोव्याने साधलेली ही गती समाधानकारक असून पुढील काही दिवसांत संपूर्ण कामकाज पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.