पणजी: सरकारने गोमंतकीय पोलिस अधिकाऱ्यांना शीतपेटीत ठेवल्यामुळे समाजावर पोलिसांचा धाक राहिलेला नाही. भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी ‘खाओ पिओ मजा करो’ अशा वृत्तीने वागत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राज्यभरात ढासळली असल्याचा आरोप फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केला.
आमदार क्रूझ सिल्वा यांनी व इतरांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना सरदेसाई यांनी हा आरोप केला. ते म्हणाले, गोव्यात मुलांचे खून होतील, असे कधी वाटले नव्हते. मात्र तेही आता होऊ लागले आहेत.
पाच वर्षांपूर्वी स्वप्निल वाळके याला मारले त्याची आठवण करून देणारी घटना सोनाराच्या दुकानात घुसून त्याच्यावर हल्ला करण्याच्या निमित्ताने घडली आहे. केपे येथे पोलिसाच्या कानशिलात मारणारा सुटला. यावरून गुन्हे उकल होत असले तरी गुन्हेगारांना शिक्षा होत नसल्याने पोलिसांचा एकंदरीत समाजावर धाक राहिला नाही.
सिल्वा म्हणाले, खून, दरोडे, महिलांवरील गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे. बलात्काराची १०६ प्रकरणे गेल्या वर्षी नोंद आहेत. २९ खून झाले, तीन दरोडे पडले. पावणे सात कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त झाले. यावरून समाजाची स्थिती कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने काय आहे, यावर पुरेसा प्रकाश पडतो.
यंदा १६ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता आवाज आल्याने एका बंद घरामध्ये शेजारी गेल्यावर तेथे दोन चोर काहीतरी चोरत असल्याचे त्याला दिसले.
त्याने पंच जॅक्सन गोम्स यांना बोलावले. पंच चोराला पकडायला धावल्यावर हेल्मेटने चोराने पंचाला मारहाण केली आणि तो पळाला. त्याला पकडल्यावर तो अंकोला येथील सराई गुन्हेगार असून तेथील न्यायालयीन खटले चुकवण्यासाठी तो नावेली येथे राहत असल्याचे दिसून आले. यामुळे भाडेकरू पडताळणी किती गांभीर्याने होते यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार एल्टन डिकॉस्ता म्हणाले, पोलिसांचा समाजावर धाक असावा. गोमंतकीय जनतेला खाणी बंद झाल्यानंतर पर्यटनाचा एकमेव आधार राहिलेला आहे. गुन्हेगारी वाढल्यामुळे गोवा हे असुरक्षित क्षेत्र मानले जाऊन पर्यटनाला त्याचा फटका बसू शकतो, याचा विचार सरकारने करावा.
बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगश म्हणाले, पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. आम्ही सर्व आमदारांनी कोणालाही पकडले, तर त्याला सोडण्यासाठी पोलिस ठाण्याशी संपर्क साधणार नाही, असे ठरवले पाहिजे.
हळदोण्याचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी गुन्हे कमी का होत नाहीत, अशी विचारणा केली. गुन्हे कमी न होण्यामागील सामाजिक कारणे काय आहेत, याचा शोध सरकारने घ्यावा. पोलिस गुन्हे नोंदवून घेत नाहीत, याकडेही लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सहा महिन्यात झालेल्या खुणांची संख्या गेल्यावर्षीच्या बारा महिन्यात झालेल्या कुणाच्या संख्ये एवढी झाल्याचे नमूद केले. राज्यातील १८७ गुन्ह्यात विदेशी नागरिकांचा असलेला समावेश चिंताजनक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, एकंदरीत गुन्ह्यांत केवळ दोन टक्के गुन्हेगार हे गोमंतकीय आहेत. अलीकडेच कोलवाळ कारागृहाची पाहणी केल्यावर तेथे असलेले बहुतांश जण बिगर गोमंतकीय असल्याचे दिसून आले. जनतेचा पोलिसांवरील विश्वास वाढल्यामुळे तक्रारी नोंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. गोमंतकीय अधिकाऱ्यांना शीतपेटीत ठेवलेले नाही, त्यांना योग्य असे काम देण्यात आलेले आहे. आमदारांनी केलेल्या सूचनांचा विचार करून गोमंतकीय आणि पर्यटकांना ही गोवा सुरक्षित वाटेल, असे वातावरण कायम ठेवण्यावर सरकार भर देईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.