मडगाव: वेर्णा येथे झालेल्या रस्ता अपघातात प्राण गमावलेल्या दुचाकीचालक राजेश नाईक यांच्या कुटुंबाला दक्षिण गोवा मोटार अपघात न्यायप्राधिकरण न्यायालयाने ३३.७० लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ही रक्कम मिळेपर्यंत त्यावर वार्षिक ९ टक्के दराने व्याजही द्यावे लागणार आहे.
प्राधिकरणाचे न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांनी हा या निवाडा दिला. राजेश हे सांकवाळ येथे राहत होते व एका चिकन शॉपमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करून दरमहा २५ हजार रुपये कमवत होते. वेर्णा येथे दुचाकीवरून जाताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी त्यांची पत्नी आराधना आणि मुलगा श्रेयश यांनी न्यायालयात दाव्याचा अर्ज दाखल केला होता. या खटल्यामध्ये ट्रकचालक चानबसाप्पा इराप्पा गोडाची, मालक एलजीएम एंटरप्रायझेस आणि बजाज अलायंझ जनरल इन्शुरन्स कंपनी यांना प्रतिवादी करण्यात आले होते. दुचाकीस्वाराने गाडीवरील नियंत्रण गमावल्यामुळे तो ट्रकसमोर आल्याचे ट्रकचालकाने बचावासाठी न्यायालयात सांगितले.
तसेच गाडीत स्पीड गव्हर्नर बसवल्याचा दावाही केला. मात्र, न्यायालयाने पुरावे आणि पंचनामा तपासल्यानंतर ट्रक चालकाचा दावा फेटाळला. अपघाताच्या ठिकाणी रस्त्यावर पडलेले ओरखडे आणि गाडी घासल्याच्या खुणा ९.२० मीटर लांब होत्या. यावरून ट्रक निष्काळजीपणे आणि भरधाव चालवला जात होता हे सिद्ध होते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.