वाळपई: आंबेडे येथे श्रवण बर्वे याच्या खून प्रकरणामुळे सत्तरीबरोबरच संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. श्रवण यांच्या खून प्रकरणी त्याचे वडील व भावाला अटक झाल्याने समाजमन ढवळून निघाले आहे. आपल्याच मुलाचा खून करण्याइतपत एवढी क्रूरता येते तरी कशी...? हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे.
राज्यात सध्या गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. चोरी, मारामारी, खून, बलात्कार आदी प्रकरणे वाढलेली दिसून येत आहेत. हे गोव्यासाठी भयावह चित्र आहे. अनेकदा क्षुल्लक कारणावरून एखाद्याचे जीवन संपविले जाते, बलात्कार, चोऱ्या, दरोडे, जमीन मालकी वरून वादावादी हे दररोजचे बनले आहे. या परप्रांतीयच गुंतलेले असतात असे नव्हे तर सुशिक्षित गोमंतकीयांचा देखील या सहभाग दिसून येत आहे. त्यामागे सूडाची भावना, वैयक्तिक राग, जमीन मालकी, आर्थिक व्यवहार अशा गोष्टी कारणीभूत ठरत आहेत.
गौरेश गावस, मासोर्डे
एखाद्या व्यक्तीचा खून करण्याची मानसिकता सूडाची भावना, तीव्र राग, असुरक्षितता, मानसिक असंतुलन किंवा चुकीच्या सामाजिक व सांस्कृतिक प्रभावामुळे तयार होऊ शकते. काही वेळा बालपणातील त्रासदायक अनुभव, दुर्लक्ष, हिंसक वातावरण किंवा योग्य भावनिक समज नसल्यामुळेही व्यक्ती हिंसक विचारांकडे झुकते. यावर आळा घालण्यासाठी समाजात नैतिक शिक्षण, मानसिक आरोग्याची काळजी, सकारात्मक संवाद आणि तणावमुक्त जीवनशैली यावर भर दिला पाहिजे. या सोबतच पालकांनी आपल्या मुलाच्या वागणुकीकडे लक्ष द्यावे, लहानपणापासूनच रागावर नियंत्रण ठेवण्याची सवय लावावी. वेळेवर समुपदेशन आणि मार्गदर्शन मिळाल्यास अनेक टोकाचे निर्णय टाळता येतात. तसेच, हिंसक वर्तनास थांबवण्यासाठी कडक कायद्यांची अंमलबजावणी करणेही आवश्यक आहे.
व्यसनाधीनता, संपत्तीचा हाव, आपुलकीची उणीव, परस्परांना समजून घेण्याची क्षमता नसणे, हेकेखोर स्वभाव, स्वार्थीपणा आणि सूडबुद्धी भावना पण तेवढीच महत्त्वाची आहे. अशानेच मनुष्य चुकीचे पाऊल टाकत असतो.
आज मुलांच्या मनावर सतत हिंसक कार्टून, गेम्स यांचा मारा होतो. विविध समाज माध्यमांवर हिंसेला चालना देणाऱ्या चित्रपटांचा सुळसुळाट आहे. म्हणूनच काहींना खून करणे सहज सोपे वाटू लागले आहे. कायद्याची, भविष्याची चिंता नसणे, भीती नसणे हेही एक कारण आहे. योग्य संस्कारमूल्यांचा अभाव असल्यामुळे अशा गोष्टी वारंवार होत आहेत. मन शांत कसे करावे याची शिकवण अगदी शाळेपासून होणे गरजेचे आहे. समाजात कायद्याचा धाक असला तर सहसा असे कृत्य कुणी करण्यास पुढे सरसावणार नाही.
सध्या माणसाची नीतिमत्ता फारच खालावली आहेत. माणूस आत्मकेंद्रित झाला आहे. नवीन पिढी भरकटत आहे. कुटुंबातील संवाद कमी होत आहे. यावर गंभीर चर्चा होऊन कुटुंब आणि शिक्षक यांना मेहनत घेऊन सक्षम आणि विविध संकटांना तोंड देईल अशी पिढी तयार करावी लागेल. हे समाजासमोरील मोठे आव्हान म्हणावे लागेल.
खून करण्यामागे मागील काळातील काही गुपित दडलेले असते. जेव्हा एखाद्याला वाटते की कायद्याने विषय सुटणार नाही तेव्हा त्याचे पाऊल टोकाकडे जाते. त्याची सहनशीलता संपलेली असते. तेव्हाच एखादा मनुष्य सूडाच्या भावनेपोटी काम करतो. त्यामुळे एखादा विषय वाढविण्याआधी समजुतीने सोडवायला पाहिजे.
खून करण्याची मानसिकता अनेक कारणांनी तयार होऊ शकते. बालपणीचा छळ, अपमान, सूडभावना, मानसिक आजार किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रभाव. तणाव, राग आदी कारणीभूत असू शकतात. यासाठी भावनिक आरोग्य वाढवणे, योग्य मार्गदर्शन, शाळांमधून नैतिक शिक्षण आणि वेळेवर समुपदेशन फार गरजेचे आहे. संवाद, सहिष्णुता आणि समजूतदारपणा वाढवणे ही देखील एक महत्त्वाची पायरी आहे.
स्वार्थी वृत्ती आपल्या समाजात विलक्षण गतीने वाढत आहे. पैसा, खोटी प्रतिष्ठा मिळवण्याच्या नादात आम्ही मानवी मूल्यांचा ऱ्हास करत आहोत. त्यामुळे जी स्पर्धा निर्माण होते, त्यात आपले प्रस्थ टिकवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आपल्या मार्गात येणाऱ्यांचे काटा काढण्याच्या नादात खून करतात. अपप्रवृत्ती वाढत असल्याने अघोरी कृती करत असतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.