मोरजी : पार्से येथील युवकांनी एकत्र येऊन श्री सातेरी भगवती कला व सांस्कृतिक मंडळातर्फे तुये येथील रैना मैदानावर आयोजित केलेला ‘अभंगवाणी- अभंग रिपोस्ट’ हा भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रम आवश्यक परवाने नसल्याच्या कारणावरून पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ऐनवेळी रद्द करण्यात आला. त्यामुळे गोवा, महाराष्ट्रातील सावंतवाडी, कोल्हापूर आदी भागांतून आलेल्या हजारो अभंगप्रेमींची मोठी निराशा झाली.
या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना पार्सेचे माजी सरपंच देवेंद्र प्रभुदेसाई यांनी सरकारवर दुजाभावाचा आरोप केला. ते म्हणाले, किनारी भागात रात्री-अपरात्री ध्वनिप्रदूषण करणाऱ्या संगीत पार्ट्या, रेव्ह पार्ट्या, ड्रग्स पार्ट्या सुरू असतात. त्यांना कोण परवाने देतो? त्या का बंद केल्या जात नाहीत? मग शांत, भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रमच परवान्यांचे कारण देऊन का बंद केले जातात?
मांद्रे गट काँग्रेसचे अध्यक्ष नारायण रेडकर यांनीही या निर्णयाचा निषेध करत, चार दिवसांपासून तयारी सुरू असताना प्रशासनाने आधीच परवान्यांविषयी सूचना का दिल्या नाहीत? असा सवाल केला.
तर, स्थानिक पंच उदय मांद्रेकर म्हणाले की, पंचायतीने या कार्यक्रमाला ना-हरकत दाखला दिला होता. संस्कृती जपणाऱ्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे गरजेचे असताना त्यांनाच अडथळे आणले जात आहेत. दरम्यान, सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या ‘अभंगवाणी- अभंग रिपोस्ट’ या कार्यक्रमाला गोव्यातही भरभरून दाद मिळाली आहे.
दुजाभाव का? सांस्कृतिक कार्यक्रमच का लक्ष्य?
रेव्ह/ड्रग्स पार्ट्यांना परवाने कोण देतो?
प्रशासनाची जबाबदारी नेमकी कोणती?
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता; मात्र आवश्यक परवान्यांविषयी आयोजकांना आधीच स्पष्ट सूचना का देण्यात आल्या नाहीत? हा कार्यक्रम ग्रामीण भागात संस्कृती जपण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. हजारो लोक उपस्थित होते. असा सकारात्मक उपक्रम बंद पाडणे दुर्दैवी आहे.देवेंद्र प्रभुदेसाई, माजी सरपंच (पार्से)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.