फोंडा: 'ज्यांना मराठी हवी त्यांनी खुशाल महाराष्ट्रात जावं', अशा आशयाची पोस्ट करुन दोन भाषिकांमध्ये भाषिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी कोकणी लेखक प्रकाश नाईक यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डॉ. मधु गावडे घोडकिरेकर यांनी याप्रकरणी म्हार्दोळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
गोव्यात गेल्या काही दिवसांपासून मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी मेळावे आयोजित केले जात आहेत. या मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर लेखक प्रकाश नाईक यांनी फेसबूकवर केलेल्या पोस्टने वादंग निर्माण झाला. डॉ. मधु गावडे घोडकिरेकर यांनी म्हार्दोळ पोलिस स्थानकात याप्रकरणी तक्रार दाखल केलीय. यावरुन पोलिसांनी नाईक यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १९(१)(अ)(ब) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
प्रकाश नाईक यांची पोस्ट नेमकी काय आहे?
'ज्यांना मराठी हवीय त्यांनी खुशाल महाराष्ट्रात जावं. हे लोक गोव्यातील तरुणांची वाट लावण्यासाठी पुढे आलेत. त्यामुळे बहुजन नीज गोंयकारांनी याला विरोध केला पाहिजे', अशी पोस्ट प्रकाश नाईक यांनी केली आहे. नाईक यांच्या या पोस्टवर जवळ १३९ कमेंट करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, गेल्यावर्षी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर मावजो यांनी कोकणी भाषेला राज्यभाषेचा दर्जा देण्याची मागणी केली होती. यानंतर देखील मोठा वादंग झाला होता. मावजो यांच्या समर्थनात उदय भेंब्रे मैदानात उतरले होते. कोकणीला राज्य भाषेचा दर्जा मिळावा असे केलेले विधान इतर भाषेचा अपमान ठरत नाही. तसेच, शांत असलेला कोकणी समाज हा प्रत्येकवेळी शांत बसणार नाही असे म्हणत भेंब्रे यांनी मराठीप्रेमी लोकांना इशारा दिला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.