पणजी: चोडण येथे धक्क्यालगत नांगरून ठेवलेल्या अवस्थेत पाण्यात बुडालेली फेरीबोट अद्याप वर काढण्यात राज्य सरकारला यश आलेले नाही. आता हे काम खासगी कंपनीकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी राज्य सरकारला लाखोंचा खर्च करावा लागू शकतो, असा अंदाज आहे.
ही फेरीबोट वर काढण्यासाठी सध्या आवश्यक यंत्रणा आणि तांत्रिक कौशल्य राज्य सरकारकडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नौकानयन क्षेत्रातील खासगी कंपन्यांकडून निविदा मागवून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बोटीचे वजन, खोल पाण्यात बुडालेली स्थिती, तसेच सुरक्षित उचलण्याचे तंत्र यांमुळे किमान १५-२० लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.
फेरीबोटीत वाहने ठेवण्यासाठी असलेली पुढील मोकळी जागा आणि मागील भाग यांच्यात अर्ध्या फुटाचे अंतर असते. मागील भाग उंच असल्याने पुढील भागात पूर्ण पाणी भरल्याशिवाय ते मागील भागात शिरत नाही. एवढी फेरीबोट पाण्याने भरेपर्यंत फेरीबोटीत असलेले कर्मचारी काय करत होते, याची माहिती मिळवली जात आहे. टोलटो- धावजी मार्गावरील फेरी भरकटल्यामुळे प्रवाशांत घबराट निर्माण झाली आहे.
या दुर्घटनेस कर्मचारी जबाबदार असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आल्यास त्यांना निलंबित करण्याची तयारी खात्याने चालवली आहे. फेरीबोट धक्क्यालगत सुरक्षितपणे नांगरून ठेवली असताना ती बुडण्याची घटना संशयास्पद मानली जात आहे. आज मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली.
फेरीबोट बुडण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याविषयीचा प्राथमिक चौकशी अहवाल तीन दिवसांनंतरही मिळालेला नाही. फेरीबोटीच्या टाकीत पाणी भरल्याने ती बुडाली, असे सांगण्यात येत असले तरी टाकी कशी भरली, हे स्पष्ट झालेले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.