Goa Cabinet Change
पणजी: राज्यातील मंत्रिमंडळातील फेरबदल हा राजकीय कारणास्तव असेल, तो मंत्र्यांच्या कामगिरीवर नसेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ फेरबदल केव्हा या प्रश्नावर माध्यमांनाच जास्त उत्सुकता आहे असे सांगून त्यांनी हा विषय टोलवला.
राज्य मंत्रिमंडळात एक - दोन जणांना संधी द्यावी लागली, तर त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींशी होणाऱ्या चर्चेनंतर घेतला जाईल. तो निर्णय अर्थात राजकीय म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतला जाईल. सर्व मंत्र्यांचे काम उत्तम चालले आहे.
प्रत्येकाची काम करण्याची आपली अशी एक शैली, पद्धत असते. काहीजण माध्यमांना आपण काय केले ते सांगत नाहीत. याचा अर्थ ते काम करत नाहीत असा होत नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदल जेव्हा करावा लागेल, तेव्हा तो राजकीय कारणास्तव, राजकीय अपरिहार्यतेपोटीच करावा लागेल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
यापूर्वी याच महिन्यात मुख्यमंत्र्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे कामगिरी अहवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे सादर केले होते.
भाजपचे राष्ट्रीय महासचिव (संघटन) बी. एल. संतोष एकदा राज्यात येऊन गेले. ते आणि इतर वरिष्ठ नेते पुढील महिन्यात गोव्यात भेट देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी मंत्रिमंडळ फेरबदल होणार असल्याच्या चर्चेला जोर आला होता. आता पुन्हा तो विषय चर्चेत आला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, की सध्या कार्यरत मंत्रिमंडळ चांगले काम करत आहे. कोणत्याही बदलांचा मंत्र्यांच्या कामगिरीशी काहीही संबंध नाही. मंत्रिमंडळात जर कोणाला समाविष्ट करायचे असेल, तर मी आणि पक्षाचे वरिष्ठ नेते मिळून निर्णय घेऊ. कोणाला वगळले गेले, तर ते त्यांच्या कामगिरीमुळे नसून राजकीय गरजांमुळे असेल.’
मागील वर्षीही सावंत सरकारमध्ये मंत्रिमंडळ फेरबदल होणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावेळी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी नवीन वर्षात हा बदल होऊ शकतो, असे सूचित केले होते. मात्र, २०२४ दरम्यान ही चर्चा केवळ अंदाजांपुरतीच राहिली आणि भाजपने वेळोवेळी दिलेल्या मुदती निष्फळ ठरल्या.
विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी सरकारमध्ये येत्या १५ दिवसांत किंवा महिन्याभरात बदल होण्याची शक्यता असल्याचे सांगितल्यानंतर या चर्चांना आणखी बळ मिळाले होते. तवडकर यांनी दिगंबर कामत, नीलेश काब्राल, संकल्प आमोणकर आणि मायकल लोबो या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. सर्व काही लवकरच स्पष्ट होईल, असे म्हटले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.