वास्को/वाळपई: तोणीर-काजरेधाट धबधब्यावर दगावलेला विद्यार्थी राहुल बिंद याच्या नातेवाईकांसह मित्रमंडळींनी शनिवारी दीपविहार शाळेसमोर येत त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न शाळा व्यवस्थापनाला केला.
त्यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते. या प्रकरणी चार शिक्षकांसह दोन टूर ऑपरेटरवर वाळपई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. शनिवारी सायंकाळी त्या सहाही जणांना वैयक्तिक हमीवर पोलिसांनी मुक्त केले. शिक्षकांनी धोकादायक धबधबा परिसरात विद्यार्थ्यांना जाण्यास परवानगी दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना घटनास्थळी नेण्यापासून ते दुर्घटना घडण्यापर्यंतची नेमकी परिस्थिती तसेच संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून वेगवेगळ्या पद्धतीने तपास केला जात आहे. या प्रकरणाचा तपास डिचोलीच्या उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. आणि उत्तर गोवा पोलिस अधीक्षक हरीश मडकईकर यांच्या देखरेखीखाली वाळपई पोलिस ठाण्याचे निरीक्षक विद्येश पिळगावकर यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू आहे.
याप्रकरणी वाळपई पोलिसांपाठोपाठ वन विभागानेही शिक्षक आणि टूर ऑपरेटर्सविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धोकादायक धबधबा परिसरात अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात दीपविहार विद्यालयाचे शिक्षक आणि कर्मचारी निधी सुर्लीकर, विद्या गावडे, ब्लेन्च फर्नांडिस व लॅब असिस्टंट यशवंत काकरवार या चौघांसह म्हापसा येथील टूर ऑपरेटर आदित्य प्रसाद दळवी आणि मंजुनाथ यांना वाळपई पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी दिवसभर चौकशी केल्यानंतर सर्व सहाही जणांना वैयक्तिक हमीवर सोडले, अशी माहिती मिळाली.
मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश
राहुल बिंद मृत्युप्रकरणी संबंधित सर्वांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
दीपविहार विद्यालयाचा विद्यार्थी राहुल बिंद याचा बुडून मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने राज्यातील धबधब्यांवरील सुरक्षा व्यवस्थेचा गांभीर्याने आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वन खात्याकडून सविस्तर अहवाल मागविला असून, पावसाळ्यातील धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेसाठी जारी केलेल्या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली होती का, याची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी ७ ऑगस्ट रोजी म्हादई अभयारण्याच्या क्षेत्र वन अधिकाऱ्यांच्या अखत्यारित असलेल्या तोणीर-काजरेधाट धबधब्याबाबत वन संवर्धन अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. सत्तरीच्या उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालाचा संदर्भ देत जिल्हाधिकाऱ्यांनी धबधब्यावरील सुरक्षा उपाययोजनांबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.