पणजी: पर्वरीत झाडल्या गेलेल्या त्या गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण गोवा हादरला. या थरारक घटनेला ९ दिवस उलटले असले, तरी अधिकृतरित्या पोलिसांच्या हाती अद्याप ठोस काहीच लागलेले नाही, पण पडद्यामागे मात्र एका हाय-व्होल्टेज सस्पेन्स थ्रिलर चित्रपटासारखा या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
आता या संपूर्ण नाट्याचा सर्वात मोठा सस्पेन्स समोर आला आहे. आरोपी सध्या भारताच्या उत्तर-पश्चिम भागात कुठेतरी लपून बसल्याची पक्की टीप मिळताच गोवा पोलिसांचे विशेष पथक तातडीने त्या दिशेने रवाना झाल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
गोळीबारानंतर आरोपी मुंबईच्या दिशेने पसार झाल्याचा संशय होता. तातडीने पोलिसांची दोन विशेष पथके मुंबईला गेली व तिथे कसून चौकशी सुरू झाली. त्यानंतर तपासाची सुत्रे फिरली आणि आरोपी मुंबईला गेलेच नाहीत, तर त्यांनी गुपचूप थिवीमार्गे कर्नाटक गाठल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांची धाव कर्नाटकच्या दिशेने झाली.
कर्नाटकचा सुगावा घेत असतानाच तपासात आणखी एक मोठा ट्विस्ट आला. संशयितांनी पत्रादेवी सीमा ओलांडून महाराष्ट्रात प्रवेश केल्याचे पोलिसांना समजले आणि तपासाची सुई पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे वळली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सतत बदलणाऱ्या या चकव्यांनंतर आता पोलिसांच्या हाती काही अत्यंत महत्त्वाचे आणि खळबळजनक धागेदोरे लागले आहेत. सुत्रांच्या दाव्यानुसार, पोलिसांनी संशयितांची पूर्ण ओळख पटवली आहे. एवढेच नाही, तर गोळीबाराच्या वेळी वापरण्यात आलेल्या दुचाकीचा क्रमांक आणि तिच्या मूळ मालकाची संपूर्ण माहिती आता पोलिसांच्या फायलीत जमा झाली आहे.
नक्की शिजतंय तरी काय?
एकीकडे गुप्त सूत्रांकडून या रोज नव्या घडामोडी समोर येत असताना, गोवा पोलिसांनी मात्र या प्रकरणावर मौन बाळगले आहे. यासंदर्भात प्रतिनिधीने अधिकृत माहितीसाठी गोवा पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान, एका वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना कोणतेही मोठे यश मिळालेले नाही.