Khapreshwar Temple Relocation Updates
पणजी: पर्वरी येथील सव्वापाच किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाला अडथळा होतो म्हणून दोनशे वर्षे जुना खाप्रेश्वराचा वटवृक्ष हटवला खरा; पण आता दोन ठिकाणी खाप्रेश्वराचे स्थान आकाराला येणार आहे. वडाकडे परिसरात १० चौरस मीटर जागा घुमटी उभारण्यासाठी दिली जाणार आहे, तर नियोजित स्थळी मंदिर उभारले जाणार आहे.
याआधी २०१९ मध्ये मंदिर आणि वटवृक्ष स्थलांतरास तत्कालीन समितीने संमती दिली होती, अशी भूमिका सरकारने घेतली होती. सध्या असलेल्या मंदिरापेक्षा नव्या ठिकाणी अधिक चांगले मंदिर उभारण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले होते.
दोनशे वर्षे जुना वटवृक्ष वाचवण्यासाठी उच्च न्यायालयात दादही मागितली होती. उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने पोलिस बंदोबस्तात वटवृक्ष हटवण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा तो हाणून पाडण्यात आला होता. त्यामुळे पहाटेच्या वेळी सर्वजण गाफील असताना वटवृक्ष आणि मूर्ती हलवण्यात आली होती.
पर्वरीवासीयांनी पर्वरी आणि मुळगावच्या श्री देव वेताळ देवस्थानात प्रसाद घेतला. मुळगावच्या प्रसादानुसार आहे त्याच ठिकाणी खाप्रेश्र्वराचे मंदिर बांधावे, तर पर्वरीच्या प्रसादात दुसऱ्या जागी मंदिर बांधता येईल, असे म्हटले होते. त्यामुळे मंदिर कुठे बांधणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी काही भाविकांसह पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि दोन्ही ठिकाणी धार्मिक स्थळ उभारण्याचे ठरविण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मंत्री खंवटे यांनी सांगितले, की खाप्रेश्वर देवस्थानासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. त्यांना पूर्ण माहिती दिली आहे. धर्मामध्ये फूट पडता कामा नये, असे आम्हाला वाटते. खाप्रेश्वर विषयावर राजकारण करण्याचा काहींनी प्रयत्न केला. त्याकडे लक्ष न देता पुढे काय करता येईल याचा विचार करण्यात आला. श्री देव खाप्रेश्वर विषयावर तेथे दोन गट आहेत. एक गट जो पूर्वी होता, त्यांना तेथेच किमान घुमटी तरी हवी आहे. दुसरा गट देवस्थान योग्य प्रकारे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावे, अशा विचारांचा आहे. दोन्ही गटांनी प्रसाद घेतला आहे.
१. खाप्रेश्वर देवाचे स्थान होते, तेथे घुमटी बांधण्यासाठी कंत्राटदाराशी बोलून १०-१२ चौरस मीटर जागा मिळवली जाईल.
२. मुख्यमंत्र्यांनी तेथे घुमटी बांधून देऊ, असे म्हटले आहे. तेथे जागा मिळण्याची व्यवस्था केली आहे.
३. अन्य ठिकाणी मंदिर बांधण्यासाठी सरकार मदत करेल. दोन्ही ठिकाणी लोकही आपला आर्थिक सहभाग दर्शवू शकतात.
४. दोन्ही ठिकाणच्या प्रसादात खाप्रेश्वर देव सीमेतच हवा, असा समान धागा आहे.
५. देव कुठे आहे, याचा सरकार विचार करणार नाही. दोन्ही गटांनी एकत्र येऊन एक जागा सुचविल्यास उत्तम.
एका ठिकाणी घुमटी, तर दुसरीकडे मंदिर बांधले जाणार, तर मूर्ती कोठे ठेवली जाणार असा प्रश्न निर्माण होणार आहे. सरकार स्थापनेसाठी मदत करणार असल्याने दुसरी मूर्ती सरकारलाच आणावी लागणार आहे; पण जूनी मूर्ती कुठे स्थापन करावी, यावरूनही दोन गट समोरासमोर येऊ शकतात.
खाप्रेश्वराच्या ठिकाणचा सुमारे दोनशे वर्षे जुना वटवृक्ष उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार दुसरीकडे हलवण्यात आला आहे. सरकारने नव्या मंदिराच्या ठिकाणी दोन वर्षे जुना वटवृक्ष लावला जाईल, असे आश्वासन दिले होते. ते ब्राह्मण स्थानही आता दोन ठिकाणी निर्माण करावे लागणार आहे.
खाप्रेश्वराचे मंदिर कुठे उभारावे, असा पेच निर्माण झाला होता. त्यातच काँग्रेसच्या नेत्यांनी त्या ठिकाणी भेट दिल्याने यातून राजकारणाला थारा मिळणार नाही, याची दक्षताही सत्ताधाऱ्यांना घ्यायची होती. त्यामुळे अखेर दोन ठिकाणी श्री खाप्रेश्वराची स्थापना करण्याचा मध्यम मार्ग शोधण्यात आला आहे.
जनभावनांपुढे सरकार कसे झुकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. सुरुवातीला भाविक आणि समितीवरच प्रसाद घेऊन सरकारने जागा ठरवण्याची जबाबदारी दिली. यातून कोणती गुंतागुंत होणार, याची सरकारला कल्पना नव्हती. आपल्यावरील जबाबदारी लोकांवर दिल्याच्या विचारात सरकार त्यावेळी होते. मात्र, त्यातून झाले वेगळेच. देवस्थानच्या जुन्या-नव्या समित्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्रसाद घेतले. त्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी मंदिर बांधण्यासाठी कौल मिळाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.