फोंडा, बदलती जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या पद्धती व शारीरिक हालचालींची कमतरता या प्रमुख कारणांमुळे लहान वयातच मुलींच्या शरीरात बदल होऊन कमी वयात पाळी येण्याचे प्रमाण वाढले आहे.
डॉ. रेवा दुभाषी यांनी लिहिलेले पुस्तक योग्य मार्गदर्शक ठरणार आहे, असे उद्गार प्रसिद्ध स्त्रीरोग तथा आयव्हीएफतज्ज्ञ डॉ. केदार पडते यांनी काढले.
फोंडा येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेवा दुभाषी यांच्या लेखसंग्रहाचे संकलन असलेल्या पाळी आणि बरेच काही'' या महिलांच्या आरोग्यविषय पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. फोंडा येथील मिनिनो ट्रेड सेंटरच्या मांडवी सभागृहात शारदा ग्रंथप्रसारक संस्थेतर्फे हा प्रकाशन सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ. शेखर साळकर व लेखिका डॉ. रेवा दुभाषी या व्यासपीठावर उपस्थित होत्या.
डॉ. रेवा दुभाषी यांनी या पुस्तकाच्या लेखनामागील प्रेरणा सांगताना लेखन हे व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम असून मुलीच्या जन्माच्या वेळी पंधरा वर्षांपूर्वी ही कल्पना सुचल्याचे सांगितले. महिलांनी आपले आरोग्य व मुलांच्या संगोपनाविषयी अधिक सजग होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
उशिरा लग्न, गर्भधारणा हेही प्रमुख कारण!
डॉ. शेखर साळकर यांनी, महिलांमध्ये वाढत्या कर्करोगाचे प्रमाण हे गर्भाशय व अंडाशय यापासून सुरू होत असल्याचे सांगितले. उशिरा होणारी लग्ने व वयाच्या तिशीनंतर होणारी पहिली गर्भधारणा हीसुद्धा महिलांच्या आरोग्यावर परिणाम करणारी काही मुख्य कारणे आहेत, असे त्यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.