पणजी, वीज खात्यातर्फे म्हापसा शहरात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी निवडलेल्या पाच कंपन्यांची पॉवर केबल न वापरता ‘डायनॅमिक'' कंपनीची पॉवर केबल वापरली आहे. ‘आयएसआय’ मार्क नसलेली केबल का वापरली, याचे उत्तर वीजमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने आज करण्यात आली.
येथील पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला वाल्मिकी नाईक, सलमान खान आणि सुनील सिंग्नापूरकर यांची उपस्थिती होती.
घरोघरी केबल कनेक्शन देताना त्यासाठी जी आवश्यक खोली गरजेची आहे, ती न ठेवता केवळ पाच इंच खोदकाम करून केबल दिली आहे. ती अत्यंत धोकादायक आहे. पावसात या केबल उघड्या पडू शकतात आणि खराबही होऊ शकतात, असे खान म्हणाले. वीजजोडण्या देताना वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी किंवा अभियंत्यांनी का पाहणी केली नाही, असा सवालही त्यांनी केला.
वीज फिडरचे आर्थिंग दिले गेले नाहीत. फिडरच्या जागी एक आर्थिंगचे पीट करण्यासाठी पाच हजारांचा खर्च येतो. एका फिडरसाठी दोन पीट लागतात. ते पीट घालण्यात आले नाही. त्याचे पैसे कुठे गेले? असा सवाल खान यांनी केला.
राजस्थानींशी एवढी मैत्री का?
वीज खात्याच्या वतीने ५ हजार कोटींच्या भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. डायनॅमिक कंपनी ही राजस्थानची असून, कंत्राटदारही राजस्थानचाच आहे. तेथील लोकांशी एवढी मैत्री कशासाठी, हे मंत्री ढवळीकर यांनी सांगावे, अशी मागणी नाईक यांनी केली.
चाचण्या घेऊनच केला वापर
भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी जे साहित्य वापरण्यात आले आहे, त्याची सर्व चाचणी करूनच तसेच मान्यताप्राप्त व प्रमाणपत्र असलेल्या कंपन्यांच्याच केबल्स आणल्या आहेत. कोणी हवेत बाण मारू नयेत, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.