पणजी: राजधानीत सुरू असलेल्या स्मार्ट सिटी बससेवेबाबत प्रवाशांमध्ये नाराजीचे सूर अद्याप कायम आहेत. दरम्यान, ही सेवा नियमित असल्याचा इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडने दावा केला असून १४ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीने ‘इव्ही बससेवा’ नियोजनबद्ध पद्धतीने चालवली जात असल्याचे सांगितले.
मार्ग व वेळा ठरवलेले असून सेवेला नागरिकांचा प्रतिसाद असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. मात्र, प्रत्यक्ष प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अनुभवांवरून वेगळीच स्थिती समोर येत आहे. दररोज पाटो-पणजी ते १८ जून रोड या मार्गावर प्रवास करणाऱ्या अल्पना केरकर व इतर प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी या मार्गावरील बस अचानक बंद करण्यात आली.
याची कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. त्यांच्याकडे स्मार्ट कार्ड असूनही त्यांना दुसऱ्या मार्गाचा पर्याय न देता हा बदल करण्यात आल्याने प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले. ही सुविधा देण्यासाठी आहे की गैरसोयींसाठी? असा प्रश्न अनेक प्रवासी उपस्थित करत आहेत.
स्मार्ट सिटीने अप्रत्यक्षपणे ही जबाबदारी कदंब परिवहन महामंडळावर टाकत म्हटले आहे की, मार्ग आणि वेळ निश्चित करण्याचे अधिकार महामंडळाकडे आहेत. त्यामुळे या गैरसोयींची जबाबदारीही त्यांच्या अंगावर पडते.
स्मार्ट सिटी आणि कदंब परिवहन महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा मागील ९ महिन्यांपासून सुरू असून, स्मार्ट ट्रान्झिट कार्ड व कंडक्टरविरहित प्रणालीमुळे प्रवास अधिक सोयीचा झाल्याचा दावा स्मार्ट सिटीचा आहे. परंतु, प्रवाशांशी थेट संवाद, सेवा बदलाची पूर्वसूचना आणि तक्रारींचे निवारण याबाबतीत अद्याप सुधारणेची गरज दिसते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.