पणजी: बिट्स पिलानीमधील ऋषी नायर या विद्यार्थ्याच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली जावी आणि त्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले जावे, अशी मागणी काँग्रेसच्या ‘एनएसयूआय’ या विद्यार्थी संघटनेने पोलिस महासंचालकांकडे केली आहे.
‘एनएसयूआयच्या’वतीने आज पोलिस महासंचालकांना अशा मागणीचे निवेदन दिले असून, या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही पाठविल्याची माहिती ‘एनएसयूआय’चे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. याप्रसंगी एनएसयूआयचे पदाधिकारी उपस्थित होते.
चौधरी म्हणाले, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांनी ऋषी नायर या विद्यार्थ्याच्या शरीरात अमलीपदार्थाचे अंश मिळाल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही बिट्स पिलानीसारख्या संस्थेच्या परिसरात अमलीपादर्थ येतात कसे, अशी विचारणा करून कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे पोलिस महासंचालकांच्या निदर्शनास आणून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यापूर्वी केवळ किनारी भागात अमलीपदार्थ मिळत असल्याचे ऐकिवात होते, पण आता किनाऱ्यावरून गावांत आणि गावांतून शहरामध्ये, तेथून ते शैक्षणिक संस्थांच्या परिसरात पोहोचले आहे. पोलिसांना याबाबत सर्व माहिती असते. बिट्स पिलानी मधील एका विद्यार्थ्याचा फेब्रुवारी २०२४ मध्ये संशयित मृत्यूविषयी अजूनही चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात असल्यानेच आम्ही संस्थेत विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणाची ‘एसआयटी’मार्फेत चौकशी करण्याची मागणी करीत आहोत.
बिट्स पिलानीमधील विद्यार्थ्याच्या मृत्यूमागील कारण अमलीपदार्थ सेवन असल्याचे उघड झाले आहे; परंतु असे पदार्थ घेण्यासाठीही मुले व्याजाने पैसे घेत असावेत. कारण अशा व्याजाने पैसे देणाऱ्यांच्या टोळ्या कार्यरत आहेत. त्यांचा पैसे मागण्याचा ससेमीराही विद्यार्थ्यांच्या मागे लागू शकतो, अशा अनुषंगानेही या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी आज केली.
काँग्रेस भवनात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतीक्षा खलप, युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष महेश नदार व इतरांची उपस्थिती होती.
भिके म्हणाले, मागील काही वर्षांत अमलीपदार्थ जप्त केल्याच्या घटना पाहिल्यास त्यातील आकडेवारीवरून जप्त होणाऱ्या अमलीपदार्थांची मात्रा अधिक असल्याचे स्पष्ट होते. अमलीपदार्थ, दारू बेकायदेशीरपणे येते यावरून राज्याच्या सीमा सुरक्षित राहिलेल्या नाहीत.
राज्यात येणारे पोलिस अधीक्षक हे केवळ राज्यात पर्यटनासाठी येतात. त्यांना येथील गुन्हेगारी संपवावी असे वाटत नाही. विद्यार्थ्यांची सुरक्षा आपण करू शकत नसल्यास राज्य सरकार त्यात अपयशी ठरते. विद्यार्थ्यांना घरातून मोजकीच रक्कम मिळते. मुले अमलीपदार्थांसाठी खासगी सावकारांकडून पैसे घेतात, असे ऐकू येते. घरपोच सेवा देणाऱ्या मुलांमार्फत अमलीपदार्थ दिले जात आहेत.
नायर म्हणाले, सांकवाळ येथे स्वीगी सेवा देणाऱ्यास ताब्यात घेतले होते, तेव्हा त्याच्याकडे गांजा सापडला होता. या परिसरात मद्याची दुकाने वाढली आहेत, अनेक युवक बिनदास्तपणे मद्य खरेदी करतात. खरेतर आपल्या परिसरात अमलीपदार्थ व्यवहार वाढले असल्याने स्थानिक आमदार आंतोनियो वाझ गप्प का आहेत, त्यांनी पोलिसांवर दबाव आणून अमलीपदार्थांना आळा घातला पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.