Goa culture 
गोवा

परंपरांना छेद देत वडिलांच्या पश्‍चात मातेने केले कन्यादान! मुलीच्या इच्छेसाठी झुगारली समाजबंधने

पुण्यातील ‘ज्ञानप्रबोधिनी’च्या महिलांकडून लग्नाचे पौरोहित्य

दैनिक गोमन्तक

योगेश मिराशी

समाजात तसेच घर-परिवारात विधवा महिलेला सर्वच बाबतीत दुय्यम स्थान दिले जाते. घरातील धार्मिक कार्यक्रमांपासून अशा महिलांना कायमच दूर ठेवले जाते. मात्र, पर्वरीतील उषा नाईक (५४) यांनी आपल्या मुलीच्या लग्नात तिच्या इच्छेसाठी समाजबंधने झुगारून देत तिचे कन्यादान केले. यासाठी उषा यांना त्यांच्या सासूबाई आणि परिवारानेही प्रोत्साहन दिले. त्यांनी दाखवलेल्या या धाडसामुळे समाजातील इतर विधवा महिलांनाही ऊर्जा मिळाली आहे.

५ जानेवारी २०२४ रोजी गोव्यात क्रांतिकारी सकाळ उजाडली. बोगमाळो येथील एका तारांकित रिसॉर्टमध्ये समुद्राच्या सान्निध्यात हे धार्मिक विधींनुसार लग्न पार पडले. उषा नाईक यांनी मुलगी गौतमी हिचे लग्नाचे यजमानपद केले, तर गोव्यातून पौरोहित्य करण्यास कुणी पुढे न आल्याने पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेतील दोन महिलांनी पौराेहित्याची जबाबदारी पार पाडली.

कारण, गोव्यातील कोणीच पुरोहित या परंपरेच्या बदलाला पाठिंबा देत नव्हते. स्व. पंडित योगराज नाईक बोरकर हे गोव्यातील प्रसिद्ध सतारवादक. त्यांची पत्नी उषा या आकाशवाणी रेडिओवरील प्रसिद्ध ‘आरजे उषा’ म्हणून ओळखल्या जातात.

त्यांची मोठी मुलगी गौतमी (३०) ही पशुवैद्यकीय डॉक्टर असून तिचे लग्न हे वास्कोमधील स्व. प्रफुल्ल डिचोलकर यांचे चिरंजीव डॉ. प्रथमेश डिचोलकर (३१) यांच्यासोबत शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले.

उषा नाईक यांनी सांगितले की, माझ्या पतीचे निधन झाल्यानंतर गौतमीची इच्छा होती की, मीच तिचे लग्नाचे यजमानपद व कन्यादान करावे. जर धार्मिक पद्धतीने लग्न करायचे असल्यास गौतमीने सांगितले होते की, ही अट मान्य असल्यास शास्त्रोक्त पद्धतीने लग्न करूया, अन्यथा नको.

उषा म्हणाल्या की, जरी इच्छा असली तरी अनेक प्रश्न उभे राहतात. यासंदर्भात मी पुरोहितांशी चर्चा केली. मात्र, कुणीच तयार झाले नाही. कालांतराने मी हा विषय सोडून देण्याचा विचार केला आणि फक्त रिसेप्शन करू, असे ठरविले. त्याच काळात मला माझ्या मुंबईतील एका मैत्रिणीचा फोन आला.

तिला मी हा प्रकार सांगितला असता, तिने मला पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेची माहिती दिली. त्यानुसार मी संस्थेशी संपर्क साधून माझी इच्छा बोलून दाखविली. त्यांनीही मला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. जरी गौतमीने इच्छा व्यक्त केली असली तरी माझ्या मनाची तयार होत नव्हती. मला थोडा वेळ लागला.

कालांतराने माझ्या मनातील घालमेल थांबली. ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या पुरोहित क्षमा पुणेकर आणि वंदना पाटील यांनी गौतमी व प्रथमेश यांच्या विवाहाचे पौरोहित्य केले. तसेच मंत्रांचा अर्थही सांगितला. हा दिवस माझ्या कायम स्मरणार्थ राहील.

सासरकडून गौतमीच्या इच्छेस आक्षेप होता का? असे विचारले असता उषा यांनी सांगितले की, गौतमीने इच्छा बोलून दाखविली होती. त्यानुसार मी गौतमीला मुलाच्या घरी बोलण्यास सांगितले. तसेच मी देखील त्यांचे मत जाणून घेतले. मात्र, त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद आला. जर एकाने सुद्धा विरोध केला असता, तर हे कार्य सिद्धीस पोहोचले नसते.

सासूबाईंचेही लाभले खंबीर पाठबळ

उषा नाईक म्हणाल्या की, गौतमीच्या इच्छेसाठी, तिच्या आनंदासाठी मी हे धाडस केले. त्यावेळी मी इतके मोठे पाऊल उचलत आहे, असा साधा विचारही माझ्या डोक्यात आला नाही. मात्र, लग्नानंतर मला फोन येऊ लागले आणि लोकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहून मी भारावून गेले.

घरातील ज्येष्ठ मंडळींनी अशा गोष्टीला विरोध केल्यास त्याचा बाऊ होतो. परंतु, माझ्या सासूबाई श्‍यामलता नाईक (७२) यांनी मला प्रोत्साहन दिले. त्या माझ्या तसेच गौतमीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यामुळेच हे कार्य निर्विघ्नपणे झाले, उषा यांनी सांगितले.

अन्यथा स्नेहमेळावा...

वडिलांच्या निधनानंतर गौतमीला आपल्या लग्नाचे यजमानपद तसेच कन्यादान हे आईनेच केलेले हवे होते. तशी इच्छा तिने लग्न ठरल्यावर बोलून दाखविली होती आणि तसे जमत नसल्यास आपणास धार्मिक पद्धतीने लग्न करायचे नाही. फक्त रजिस्ट्रेशन आणि स्नेहमेळावा (रिसेप्शन) पुरेसे आहे, असे गौतमीने आईला सांगितले होते. त्यानंतर उषा यांनी मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी व तिच्या आनंदासाठी हे पाऊल उचलले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

Colva Beach Pollution: कोलवा किनाऱ्याची झाली दैना! कचरा आणि अस्वच्छतेमुळे पर्यटकांनी फिरवली पाठ; स्थानिकांनी प्रशासनावर ओढले ताशेरे

Goa Assembly Election 2027: वेळ अजूनही गेलेली नाही! 2012चा इतिहास पुन्हा घडणार? गोव्यात बदलाची हवा वाहण्यासाठी विरोधकांची एकजूट हवीच

Goa Tiger Death: वाघाच्या मृत्यूनं खळबळ! खाणींच्या विळख्यात संपतोय 'जंगलाचा राजा'? पण वनखात्याची सोयीस्कर अनास्था

SCROLL FOR NEXT