मोरजी: स्थानिकांच्या वाढत्या दबावामुळे मांद्रे पोलिसांना अखेर उमाकांत राघोबा खोत (वरचावाडा-मोरजी) यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी चौघांविरोधात तब्बल २४ तासांनंतर खुनाचा गुन्हा नोंद केला. या प्रकरणी मुख्य संशयित अशोककुमार नेदरूमली याला मदत केल्याप्रकरणी लोकेश पुत्तूस्वामी, रोहित कुमार प्रजापती व विजी सुपन या त्याच्या तीन कामगारांना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास अटक करण्यात आली.
तर, अशोककुमार बेपत्ता असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आपण कूळ असलेल्या जागेत डोंगर कापणी होत असल्याच्या संशयावरून उमाकांत खोत हे काल दुपारी दीड वाजता वरचावाडा-मोरजी येथील मालमत्तेत गेले होते.
त्यानंतर त्यांचा मृतदेह गंभीर जखमा झालेल्या अवस्थेत सापडला होता. मालमत्ता विकत घेतलेल्यानेच हे कृत्य केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी त्यांना अटक होईपर्यंत खोत यांचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आमदार जीत आरोलकर यांनीही अशा कृत्यांमागे रियल इस्टेट लॉबी असल्याचा आरोप करत पोलिसांना कारवाईसाठी रात्रभराची मुदत दिली होती. मध्यरात्रीपूर्वी चारपैकी तिघांना पोलिसांनी गजाआड केले आहे.
या प्रकरणात जे सामील आहेत, त्या सर्वांना अटक केली जाईल, अशी माहिती मांद्रेचे पोलिस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांनी दिली. मालमत्ताधारक अशोककुमार नेदरूमली यांनी सर्वे क्र. १५६/३ या जमिनीवरील मालकीहक्काच्या वादातून कट रचून आपल्या सहकाऱ्यांसह लोकेश पुत्तूस्वामी (पर्यवेक्षक), रोहितकुमार प्रजापती (यंत्रचालक) आणि विजी सुपन (स्वयंपाकी व माळी) या तिघांसोबत संगनमताने उमाकांत यांच्यावर हल्ला केला असे पोलिसांचे म्हणणे आहे.
खोत हे सर्वे क्र. १४९/१ ल १५६/३ या मालमत्तेत कूळ असून वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांना गंभीर मारहाण करण्यात आली. त्यातून त्यांना गंभीर दुखापत झाली व उपचारासाठी त्यांना तुये सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेप्रकरणी मांद्रे पोलिसांनी खोत यांचे भाचे अर्जुन गावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ६१ (२) (अ) तसेच ३ (५) अन्वये खून तसेच कट रचल्याचा गुन्हा नोंदवला आहे. गुन्ह्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आमदार जीत आरोलकर यांनी आज उमाकांत यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर स्थानिकांनी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी पेडणे पोलिस उपअधीक्षक सलीम शेख व अधिकारी उपस्थित होते. मोरजीत होणाऱ्या प्रकल्पालाही आमचा विरोध आहे. त्यासाठी आम्ही ग्रामपंचायत आणि सरकारला निवेदन सादर करणार आहोत, असेही स्थानिकांनी आमदार आरोलकर यांना सांगितले.
केवळ मजुरांना पकडून काही साध्य होणार नाही. जे कोण त्या जमिनीचे मालक आहेत, त्यांनाही अटक झाली पाहिजे. त्यांना अटक झाली नाही तर कोणत्याही परिस्थितीत आम्ही उमाकांत यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा नागरिकांनी यावेळी आमदार जीत आरोलकर यांच्या उपस्थितीत दिला होता. त्यानंतर आमदार आरोलकर यांनी लवकरच सर्व संशयितांना अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.