पणजी: ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची ‘म्हाजी बस’ योजना अखेर थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. खाजगी बस वाहतूकदारांच्या दबावामुळे राज्य सरकारने ही योजना येत्या १६ मे पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दुर्गम भागांतील लोकांसमोर पुन्हा एकदा वाहतुकीचा प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे एकीकडे ही योजना बंद करत असताना, दुसरीकडे प्रति किलोमीटर ३ रुपये इंधन अनुदान, वार्षिक वाहन विमा खर्चात ५० टक्के सवलत आणि नवीन बस खरेदीसाठी तब्बल १० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा सरकारचा विचार आहे.
ऑगस्ट २०२३ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर ‘म्हाजी बस’ योजना सुरू करण्यात आली होती. कदंब परिवहन महामंडळ लिमिटेडने ऑगस्ट २०२३ ते एप्रिल २०२५ या काळात या योजनेतून सुमारे ११.१० कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता.
मात्र, ही योजना चालवण्यासाठी सरकारला ११.६६ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान द्यावे लागले होते. विशेष म्हणजे २०२५-२६ च्या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या योजनेच्या विस्तारासाठी ८ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती.
या योजनेअंतर्गत एकूण ५७ बसेस काणकोण, केपे आणि दक्षिण गोव्यातील इतर दुर्गम भागांतील मार्गांवर धावत होत्या. ज्या ठिकाणी विशेषतः संध्याकाळच्या वेळी, सार्वजनिक वाहतुकीची मोठी गैरसोय होते, अशा भागांना या योजनेने लक्ष्य केले होते.
खाजगी बस चालकांनी ‘म्हाजी बस’ योजनेला सुरुवातीपासूनच तीव्र विरोध दर्शवला होता. २०१८ सालापासूनचे सुमारे ३६ कोटी रुपयांचे इंधन अनुदान अद्याप प्रलंबित असल्याचा त्यांचा दावा होता. या सततच्या विरोधामुळे आणि दबावामुळे अखेर सरकारने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.