पणजीआज आम्ही राजकीय सीमांमध्ये बांधले गेलो आहोत; परंतु पश्चिम घाट आणि म्हादई खोऱ्यात राहणाऱ्या आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या सर्वांसाठी म्हादई महत्त्वाची असून जर कर्नाटकने म्हादई नदीचे पाणी वळविले, तर त्याचा परिणाम गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा तिन्ही राज्यांवर होणार आहे. त्यामुळे तिन्ही राज्यांतील नागरिकांनी राजकीय पक्ष, भाषा, आपापसांतील मतभेद दूर करून याविरोधात जनआंदोलन उभारणे काळाची गरज आहे, असे मत कॅप्टन नितीन धोंड यांनी व्यक्त केले.
प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवाने शनिवारी (ता.५) येथे आयोजित केलेल्या ‘म्हादई नदी वळविल्यास गोवा आणि पश्चिम घाटावर होणारे परिणाम’ याविषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला पर्यावरण तज्ज्ञ क्लॉड आल्वारीस, ॲड. नॉर्मा आल्वारीस, ‘आप’चे आमदार कुझ सिल्वा आदी मान्यवर उपस्थित होते.
धोंड म्हणाले की, कर्नाटक म्हादईचे पाणी वळवून आम्ही धारवाड हुबळीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवत आहोत असे सांगते, परंतु हा कर्नाटकी कावा असून त्यांना हे पाणी ऊस उद्योगाच्या वाढीसाठी हवे आहे. जर कर्नाटकची कळसा, हलतरा आणि भांडुरा ही धरणे उभी राहिली, तर पश्चिम घाटातील पर्यावरण आणि जैवसंपदेचा धोका निर्माण होणार आहे. पर्यावरण संतुलन बिघडेल, ही सर्वांसाठीच धोक्याची घंटा आहे.
देशात ब्रिटीश आणि पोर्तुगीज आल्याने राजकीय सीमा निर्माण झाल्या. ज्यावेळी मनुष्य नव्हता, तेव्हापासून म्हादई आणि मलप्रभा नदी वाहत आहे. कर्नाटक आपल्या पाण्याची क्षमता वाढविण्यासाठी बेन्निहळ्ळी येथे मोठ्या प्रमाणात पावसात पूर येतो तेथे ‘पाणी अडवा आणि जिरवा’ प्रकल्प राबवून पाणीसाठा वाढवू शकतात. परंतु ‘म्हादई’ वळविल्यास त्याचे परिणाम कर्नाटकलाही भोगावे लागतील. मलप्रभेच्या खोऱ्यात सद्यस्थितीत ९ साखर कारखाने आहेत आणि दहाव्या कारखान्याला परवानगी देण्यात आली आहे, जी धोक्याची असल्याचे धोंड यांनी सांगितले.
म्हादईचे पाणी वळवून संवेदनशील क्षेत्र-१ मध्ये धरणे उभारण्यात येतील. ज्यामुळे पर्यावरण हानी, कमी पाऊस, तापमान वाढ होईल, असे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या अहवालात म्हटले आहे.
पश्चिम घाटावरील आर्द्रतेवर नैऋत्य मान्सून अवलंबून आहे. जर पाऊस कमी पडला तर त्याचा फटका गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रालाही बसेल.
म्हादईचे पाणी समुद्रापर्यंत जात असलेल्या खोऱ्यातील ‘लाडक्याचो धबधबा’ व इतर धबधबे सुकतील. गोव्यातील कृषीवर परिणाम होईल.
म्हादईचे गोडे पाणी आणि समुद्राचे पाणी मिसळून जी मत्स्यसंपदा निर्माण होते ती संपुष्टात येईल. जमिनीतील क्षारता वाढेल.
म्हादई वळविल्याने भीमगड अभयारण्यालाही धोका आहे. पश्चिम घाट केवळ एका विशिष्ट राज्यासाठी नसून सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.