फोंडा: उसगाव - पाळीतील म्हादई नदीत मासेमारीसाठी खुलेआम जिलेटीनचे स्फोट करण्यात येत असून या जिलेटीनच्या जबरदस्त स्फोटांमुळे मत्स्यसंपदेची हानी तर होतेच, शिवाय नदीकाठच्या भागातील घरांनाही भेगा पडल्या आहेत.
हे जिलेटीनचे स्फोट असेच चालू राहिले, तर ही घरेच जमिनदोस्त होण्याची भीती तेथील नागरिकांनी व्यक्त केली असून पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन नदीच्या पात्रातील हे जिलेटीनचे स्फोट थांबवावेत आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.
उसगाव - पाळी भागात आमुर्ली, अंबिकानगर, भामई, रूमड, चावडी, खाजन, वाघुर्मे व पुढे नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जिलेटीनचे स्फोट करून मासेमारी करण्यात येत आहे. नदीच्या पात्रात माशांचा थवा पाहिला की लगेच जिलेटीनची कांडी पेटवून ती नदीच्या पात्रात फेकली जाते, ज्यामुळे जबरदस्त स्फोट होऊन मासे मरून पडतात. त्यानंतर हे जिलेटीनचे स्फोट करणारे मासे गोळा करून विकतात, मात्र या प्रकाराकडे सरकारी यंत्रणेचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
नदीच्या पात्रात स्फोट करून मासेमारी करणाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे लोक शिविगाळ करून पळ काढतात. मात्र, पुन्हा जिलेटीनचे स्फोट नदीच्या पात्रात करतात. या जिलेटिनच्या स्फोटामुळे नदीच्या पात्राची झीज होत आहे.
आधीच नदीचे पात्र रूंद होत चालले असून नदीच्या काठावरचे माड तसेच इतर झाडे नष्ट होत चालली असतानाच आता जिलेटीनचे स्फोट करून नदीच्या पात्रातील मत्स्यसंपदा नष्ट करण्याचा प्रकार होत आहे. मात्र, पोलिस, बंदर कप्तान खाते आणि इतर सरकारी यंत्रणा या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने सरकारी यंत्रणेला जाग आणण्याचे काम संबंधितांनी करावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
मत्स्यसंपदेबरोबर खुबेही नष्ट..!
पाळीतील नदीत शिंपले मोठ्या प्रमाणात पूर्वी मिळत होते. मात्र, अनिर्बंध आणि अंदाधुंद खाण व्यवसायामुळे बार्जमध्ये हा खनिज माल भरून नेण्याच्या प्रक्रियेवेळी खनिज माल नदीच्या पात्रात पडण्याच्या कृतीमुळे हे शिंपलेच नष्ट झाले.
आता खाणी बंद होऊन पंधरा वर्षांचा काळ सरला असल्याने पुन्हा एकदा शिंपले अर्थातच खुबे मोठ्या प्रमाणात नदीच्या पात्रात आढळत आहेत. मात्र, जिलेटिनच्या स्फोटांमुळे हे खुबेही नष्ट होण्याच्या मार्गावर असून सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहावे, असे मत व्यक्त होत आहे.
एक काळ होता, ज्यावेळेला म्हादई नदीतील खुबे काढून लोक उदरनिर्वाह करायचे, पण मध्यंतरीच्या काळात हे खुबे नष्टच झाले होते, आता पुन्हा एकदा खुबे नदीच्या पात्रात दिसत आहेत. मात्र, सातत्याने जिलेटीनचे स्फोट घडवून आणण्याच्या कृतीमुळे हे खुबेच नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
- विश्वनाथ शिवा नाईक, (उसगाव)
जिलेटीनचे स्फोट नदीच्या पात्रात करून मोठ्या प्रमाणात मत्स्यसंपदेची हानी करण्याचा प्रकार काही नतद्रष्टांकडून केला जात आहे. हे प्रकार त्वरित बंद व्हायला हवेत, त्यासाठी पोलिसांनी नदीच्या किनारी गस्त घालण्याची गरज आहे. अशा नतद्रष्टांना कडक शासन केले तरच मत्स्यसंपदा टिकून राहू शकेल.
-सुनील जयराम वळवईकर, (पाळी)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.