पेडणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज देश सुरक्षित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होण्याची गरज असून देशाची अस्मिता, स्थिरता आणि अखंडता अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून भाजपसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.
त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि पन्ना प्रमुखांनी आपली भूमिका राष्ट्रहितासाठी पार पाडावी, असे आवाहन गोवा प्रदेश भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांनी हसापूर येथे केले.
चांदेल - हसापूर, वजरी आणि कासारवर्णे या पंचायत क्षेत्रातील पन्ना प्रमुखांच्या संमेलनात तसेच भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी व्यासपीठावर पेडणे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा हस्तकला लघुउद्योग विकास महामंडळाचे चेअरमन प्रवीण आर्लेकर, पेडणे मतदारसंघाचे निरीक्षक दत्ता रेडकर, पेडणे भाजप मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास गवस, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष तथा नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, पेडणे भाजप मंडळाचे सरचिटणीस तथा सरपंच सुबोध महाले, वजरीचे सरपंच अनिल शेट्ये उपस्थित होते.
आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले, की केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात तसेच राज्यात चौफेर विकास झालेला आहे. पेडणे मतदारसंघात मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच धारगळ येथे आयुष इस्पितळ हे मोठे प्रकल्प आले आहेत. यापुढेही आणखी प्रकल्प येणार आहेत.
भोमवासीयांचा बहिष्काराचा निर्णय दुर्दैवी ः श्रीपाद नाईक
कळंगुट (प्रतिनिधी): आगामी लोकसभा निवडणुकीत माझा सहाव्यांदा विजय हा निश्चित असून भोमातील चार पाच कुटुंबीयांनी विरोध केल्याने त्याचा माझ्या यंदाच्या विजयावर परिणाम होणार नाही, भोमवासीयांनी यंदाच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचे उत्तर गोवा लोकसभेचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी केले.
कळंगुट मतदारसंघात आपल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्थानिक आमदार मायकल लोबो यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर ते बोलत होते. भोमवासीयांनी कुणाच्याही भूलथापांना बळी न पडू नये, असे ते म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.