मडगाव: पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी, गोव्याच्या भविष्यासाठी राज्यात कोळसा नको, ही लोकांची भूमिका कायम असताना, सरकार कोळसा व्यावसायिकांचे गुलाम झाले आहे. सरकार विविध कारणे देत लोकांची दिशाभूल करत आहे.
आता लोकांनीच एकत्र येऊन ताकद दाखवण्याची वेळी आली आहे, असा इशारा समविचारी कार्यकर्त्यांनी गुरुवारी मडगावच्या लोहिया मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषेदेत दिला.
लोहिया मैदानावर कोळसाविरोधी आंदोलनात गुन्हे नोंद असलेल्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस, रेनबो वॉरिअर्सचे अभिजित प्रभुदेसाई, खासदार, आमदार व्हेंझी व्हिएगस, विकास भगत, फ्रेडी ट्राव्हासो, सबिना मास्कारेन्हस, रॉयला फर्नांडिस, संदेश तेलेकर उपस्थित होते.
भाजप सरकार आणत असलेले सर्व प्रकल्प एकमेकांशी निगडीत आहेत. सागरमाला, नदी राष्ट्रीयीकरण, लोकांचा विरोध असलेले तिन्ही प्रकल्प हे लोकांना नको असताना लादले जात आहेत. प्रवासी वाहतुकीसाठी नाही तर कोळसा वाहतुकीसाठीचे प्रकल्प आणले जात असून त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे.
कोळसा वाहतुकीत सहभागीच स्टील प्रकल्पासाठी म्हादईचे पाणी वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात सरकारचा पाठिंबा मिळत आहे. राज्यात विविध ठिकाणी जेटी उभारणी करण्याचा प्रयत्न होत आहे. सरकार हे राष्ट्रविरोधी काम करत आहेत. १०० पेक्षा जास्त पंचायतींनी कोळसाविरोधी ठराव घेतला आहे. लोकांना नको असलेल्या प्रकल्पांविरोधात लोकांची ताकद दाखवण्याची गरज आहे, असे अभिजित प्रभुदेसाई म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.