तिसवाडी: सांतआंद्रेतील बांबोळी परिसरात एका बांधकाम कंपनीकडून डोंगर कापणी करून निसर्गाची हानी केली जात असून सर्व नियम धाब्यावर बसून हे काम केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. परवानगी नसताना खोदकाम करून भोवतीच्या परिसराला धोका निर्माण केल्याचा दावा येथील आवेर्तिनो मिरांडा यांनी केला आहे.
मिरांडा यांनी यासंदर्भात अधिकृतरीत्या तक्रार केल्यानंतर जलस्रोत खात्याकडून पाहणी करण्यात आली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मिरांडा यांनी बांधकाम कंपनीकडून बेकायदा काम केले जात असल्याची माहिती दिली. उतरणीवर असलेल्या जागेवर डोंगर कापणी केली गेली आहे. तसेच एफएआर ४० टक्के असेल तर येथे ८० टक्के केला गेला आहे. त्याशिवाय भूजलाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार येथे घडत आहे. ही जमीन पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी मिरांडा यांनी केली.
यावेळी आपचे उपाध्यक्ष रामराव वाघ आणि माया डिसोझा उपस्थित होते. वाघ यांनी या कामाला आक्षेप घेताना बांबोळीच्या (Bambolim) अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून येथील निसर्ग संपविण्याचे काम असल्याचे सांगितले.
रामराव वाघ यांनी कुडका-बांबोळी-ताळावली पंचायत, स्थानिक आमदार विरेश बोरकर आणि स्थानिक पंचसदस्यांनी हा विध्वंस थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. बांबोळीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून बाहेरून कंपनी येऊन निसर्ग (Nature) संपविण्याचे काम करत आहे. या ठिकाणी कॅसिनो येणार असल्याने त्यांना कोणच थांबवणार नसल्याचा त्यांचा समज झाल्याचे दिसते. हा प्रकार थांबला नाही, तर आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.