पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने पाकड्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत घेतला. पाकिस्तानला शिकस्त दिल्यानंतर भारतीय लष्कराचे सर्व स्तरातून कौतुक झाले. पंतप्रधान मोदी यांच्यासह संरक्षणमंत्री यांनी भारतीय लष्कराच्या धाडसाला सलाम केला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गोव्यातून पाकिस्तानवर निशाणा साधला. सिंह शुक्रवारी (29 मे) गोवा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी गोव्यात (Goa) आयएनएस विक्रांतला भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, 'आज आयएनएस विक्रांतवरील नौदल योद्ध्यांमध्ये उपस्थित राहून मला खूप आनंद होत आहे. जेव्हाही मी भारताच्या सागरी शक्तीचा गौरव असलेल्या आयएनएस विक्रांतला भेट देतो तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहत नाही. जोपर्यंत देशाच्या सागरी सीमांची सुरक्षा मजबूत आहे, तोपर्यंत कोणीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही.'
सिंह यांनी पुढे आपल्या भाषणादरम्यान पाकड्यांविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा देखील उल्लेख केला. सिंह म्हणाले की, ''ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेले नाही. ते केवळ पुढे ढकलण्यात आले आहे. पाकिस्तान (Pakistan) आपल्या नौदलाच्या तयारीने देखील घाबरला आहे. 1971 मध्ये जेव्हा नौदल अॅक्शनमोडमध्ये आले तेव्हा पाकिस्तानचे 2 तुकडे झाले होते. जर ऑपरेशन सिंदूरदरम्यान नौदल अॅक्शनमोडमध्ये आले असते तर पाकिस्तानचे कदाचित 4 तुकडे झाले असते.''
ते पुढे म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारतीय नौदलाने आपल्या सायलेंट सर्व्हिसने प्रत्येक भारतीयाला प्रभावित केले. सायलेंट राहून भारतीय नौदलाने पाकिस्तानी सैन्याला बांधून ठेवले. जरा कल्पना करा की, सायलेंट राहूनही भारतीय नौदल एखाद्या देशाच्या सैन्याला धास्ती भरवू शकते तर अॅक्शनमोडमध्ये आले असते तर काय झाले असते? यावेळी पाकिस्तानला भारतीय नौदलाच्या अग्निशक्तीचा सामना करावा लागला नाही. जर पाकिस्तानने यापुढे कोणतेही भ्याड कृत्य केले तर भारतीय नौदल देखील त्याला चोख प्रत्युत्तर देईल.'
संरक्षणमंत्री पुढे असेही म्हणाले की, 'पाकिस्तानने हे समजून घेतले पाहिजे की स्वातंत्र्यापासून ते खेळत आलेला दहशतवादाचा खेळ आता धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. आता जेव्हा पाकिस्तान भारताविरुद्ध कोणतेही दहशतवादी कृत्य करेल तेव्हा त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतीलच, शिवाय नेहमीप्रमाणे पराभवाला देखील सामोरे जावे लागेल.'
सिंह म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नाही तर दहशतवादाविरुद्ध भारताचा पुढचा हल्ला आहे. आपण यापुढेही दहशतवादाविरुद्ध पाकिस्तान कल्पानाही करणार नाही असा धडा शिकवू. पाकिस्तानी भूमीतून भारतविरोधी उघडपणे दहशतवादी कारवाया केल्या जातात. भारत सीमेच्या या आणि त्या बाजूला आणि समुद्रात दहशतवाद्यांवर सर्व प्रकारचे ऑपरेशन राबवण्यास आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत. आज जगातील कोणतीही शक्ती भारताला दहशतवाद्यांचा खात्मा करण्यापासून रोखू शकत नाही.'
राजनाथ सिंह शेवटी म्हणाले की, 'पाकिस्तानच्या भूमीतून चालणाऱ्या दहशतवादाची फॅक्टरी स्वतःच्या हातांनी उखडून टाकणे हेच पाकिस्तानच्या हिताचे असेल. एवढचं नाहीतर पाकिस्तानने हाफिज सईद आणि मसूद अझहर सारख्या दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करुन याची सुरुवात करावी. हे दोघेही केवळ भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत नाहीत तर ते संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद्यांच्या यादीत देखील आहेत. हाफिज सईद मुंबई हल्ल्याचा गुन्हेगार आहे. समुद्रमार्गे मुंबईत येऊन निष्पाप लोकांना मारण्याच्या गुन्ह्यात तो दोषी आहे. अलीकडेच, मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.