सर्वेश बोरकर
दख्खनच्या पठारावर होयसळांनी ३०० वर्षांहून अधिक काळ राज्य केले. द्वारसमुद्र (सध्याचे हळेबिडू) ही त्यांची राजधानी. होयसळ राज्यकर्ते त्यांच्या शौर्यासाठी ओळखले जातात. होयसळांचे शौर्य त्यांचे अभिजात अंगरक्षक गरुड लेंका जमातीच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच. या जमातीने त्यांच्या राज्यकर्त्यांशी निष्ठेची शपथ घेतली होती. त्यांची निष्ठा आणि बांधीलकी अशी होती की, जर त्यांना त्यांच्या राजाला ठार मारल्याची बातमी कळली तर ते पाप अक्षम्य आहे, समजून स्वतःचा शिरच्छेद करतील.
कर्नाटक राज्यात मंड्या जिल्ह्यातील ‘केआर पेट’ या मुख्य शहराच्या उत्तर-पूर्व दिशेला बचाहल्ली हे एक छोटेसे गाव. अग्रहार बचाहल्ली येथील श्रीहुनसेश्वर स्वामी मंदिरात या गरुड लेंकरूंचा संदर्भ देणारे होयसळ शिलालेख असलेले तीन खांब आपल्याला आजही पाहायला मिळतात. होयसळ राजे वीर बल्लाळ यांच्या कारकिर्दीत हे खांब उभारण्यात आले होते. प्रत्येक खांब १५ फूट उंच असून, बचाहल्ली येथील बनंजू कुटुंबातील मुगिला पंथातील सात पिढ्यांच्या अभिजात योद्ध्यांच्या पराक्रमाचे व होयसळ राजांचे आत्मघाती अंगरक्षक यांचे स्मृतीस्तंभ मंदिरासमोर दिमाखात उभे आहेत.
गावातील शिवमंदिर असलेल्या हुनसेश्वराच्या मंदिराच्या आवारात होयसळ राजवटीत सरंजामशाही गटाच्या अस्तित्वाचा शिलालेख असलेला हा स्मृती स्तंभ म्हणजे एक अद्वितीय शिलालेख असलेला वीरदगड(हिरो स्टोन) आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार गरुड हे भगवान विष्णूचे वाहन. ज्याप्रमाणे गरुडाने विष्णूचा भार वाहिला, त्याचप्रमाणे या योद्ध्यांच्या गटाने होयसळ सार्वभौमत्वाचा भार वाहिला. सुमारे १५ फूट उंचीचे हे तीन स्तंभ होयसळ घराण्यातील बल्लाळ-पहिला आणि नरसिंह तिसरा यांच्या कारकिर्दीत उभारले गेले होते, ज्यांनी त्यांची राजधानी द्वारसमुद्र (सध्याचे हळेबिडू) येथून राज्य केले होते.
राज्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आत्मदहन केले, त्या वीर योद्ध्यांच्या स्मरणार्थ होयसळ सार्वभौमत्वाच्या कल्याणासाठी त्यांची स्मृती म्हणून हे स्तंभ उभे करण्यात आले.
होयसळ योद्धा प्रशासक, ज्याला राजाचे गरुडासारखे राजांचे वाहन बनायचे आहे, त्याला आज्ञापालन आणि सार्वभौमत्वाच्या निष्ठेची शपथ घ्यावी लागे. हे गरुड लेंका त्यांच्या शरीरावर सोन्याचे किंवा चांदीचे दागिने -‘गंडपेंद्र’ या स्वरूपात एक विशेष चिन्ह धारण करत, जे त्यांच्या डाव्या पायाला बांधलेले असे आणि चालताना त्यांचा नाद होत असे. गरुडाची पत्नी किंवा बायका त्याच पद्धतीने दागिने परिधान करून शपथ घेत आणि पतीसह मरण पावत. अशा पत्नीला ‘लेंकी’ असे नाव देण्यात येत असे व ज्यांच्याशी ते संलग्न होते त्या गरुडाच्या मृत्यूनंतर या लेंकिनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आपल्याला शिलालेखात उल्लेख सापडतो.
बचाहल्ली गावातील स्तंभ वीर बनंजू या व्यापारी समुदायाच्या मुगिले कुटुंबातील गंडनारायण-सेट्टीच्या गरुडांच्या सात पिढ्यांच्या शौर्याचे चित्रण करतो. व्यापारी वर्गाशी संबंधित असलेले कुटुंब आणि बहुधा नंतर होयसळांनी सत्ताधारी अभिजात वर्गाच्या पदावर चढवले असावे.
या गरुड आणि लेंकांनी त्यांच्या राजांना पाठिंबा देणाऱ्या अनेक लढायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. ते केवळ युद्धकलेच्या गुणांमध्येच पारंगत नव्हते तर त्यांच्यापैकी काहींना संगीत, प्रशासकीय स्तर आणि अनेक कवींना आश्रय देण्याची क्षमता होती. तेराव्या शतकात गरुड पंथ आपल्या शिखरावर पोहोचला. कारण ते होयसळांच्या अंतर्गत सामंथा प्रणालीमध्ये निपुण होते, त्यांना ‘सामंथा गरुड’ म्हणून संबोधले गेले. चालुक्य, यवन आणि चोल यांच्याविरुद्ध होयसळ राज्याच्या विस्तारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
शिलालेख असलेल्या वीरदगडवर कुवरा लकुमाची कथा कोरून ठेवली गेलेली आहे. कुवरा लकुमा राजा बल्लाळच्या खाली सेनापतीपदाचा वीर योद्धा होता. तो राजाच्या राजवाड्यांत वाढला होता आणि तो राजाचा मानेमगा (पालक पुत्र) होता. असे म्हटले जाते की त्याने शासकाला आपले जीवन देण्याची शपथ स्वीकारली होती. गरुड लेंकरूच्या १,००० सदस्यांच्या पथकासह, वीर बल्लाळचा कालखंड होयसळ भाग्याचे शिखर म्हणून ओळखले गेले. त्याने केवळ कोंगलवास, चेंगलवास आणि उच्छंगीच्या पांड्य यांसारख्या अनेक दुर्दम्य प्रमुखांना वश केले एवढेच नव्हे तरसोरातुरच्या युद्धात (इ. स. ११९०) देवगिरीच्या सेउना शासक, भिल्लामा पंचम यांच्यावर उल्लेखनीय विजय मिळवला.
वीर बल्लाळ द्वितीयने चोल शासक कुलोथुंगा तृतीय याच्यासोबत निष्ठा ठेवली. जेव्हा त्याच्या पांड्या राज्यकर्त्यांनी कुलोथुंगाचा पाडाव केला, तेव्हा बल्लाळाने आपला राजपुत्र नरसिंह दुसरा याला चोल राजाच्या बचावासाठी पाठवले आणि यशस्वीरीत्या कार्य पूर्ण केल्यानंतर, ‘चोलराज्यप्रतिष्ठापनाचार्य’ ही पदवी उचितपणे धारण केली. १२२०मध्ये वीर बल्लाळ यांचा मृत्यू झाला तेव्हा कुवरा लकुमा आणि त्यांची पत्नी सुग्गलादेवी यांच्यासह समर्पित अंगरक्षकांनी स्वतःचा शिरच्छेद केला. ही घटना हेल कानडीत शिलालेखात नोंदवली गेली आहे ज्याचे भाषांतर: ‘वीर बल्लाळच्या महामंत्री आणि त्यांच्या पत्नीसारखे शौर्याचे उदाहरण यापूर्वी कोणीही ठेवले नव्हते’.
होयसळांच्या वेळी कब्बाह नाडूमध्ये मुगिला पंथाचे उच्चभ्रू योद्धे होते. कब्बाहू हा शब्द, कब्बिनदा बाहू (लोखंडी हात) हे दोन शब्द एकत्र येऊन बनला आहे. गरुड लेंका हे होयसळ साम्राज्याचे परोपकारी आत्मघाती पथक होते. ते त्यांच्या शासकासाठी मरण्यास तयार होते. ‘गरुड लेंका’ हे पद वारशाने मिळत नसे. ते मिळवावे लागे. हे पद श्री महाविष्णूचे एकनिष्ठ गरुडाचे पद किंवा उपाधी होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.