पणजी : केंद्रीय आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने कोळसा वाहतुकीसाठी होस्पेट ते बेळ्ळारीदरम्यान तिसरा व चौथा लोहमार्ग उभारण्याच्या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. त्यामुळे भविष्यात मुरगाव बंदरातून वाहतूक केल्या जाणाऱ्या कोळसा वाहतुकीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुरगाव बंदरात हाताळण्यात येणारा बहुतांश कोळसा बेळ्ळारी येथे नेला जातो.
वास्को, मडगाव, कुळे, लोंढा, हुबळी, गदग, कोप्पाळ, होस्पेट आणि बळ्ळारी असा हा लोहमार्ग आहे. सध्या होस्पेट ते बळ्ळारी दुहेरी लोहमार्ग आहे. मात्र, कोळसा वाहतुकीसाठी तो अपुरा पडत असल्याने आणखी दोन समांतर लोहमार्ग घालण्यासाठीच्या प्रकल्पाला केंद्रीय आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या तीन प्रकल्पांना तसेच १८ हजार ५०९ कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी खर्चाला मंजुरी दिली आहे. त्यात होस्पेट ते बळ्ळारीदरम्यान तिसरा व चौथा लोहमार्ग घालण्याच्या प्रकल्पाचा समावेश आहे. याशिवाय कसारा - मनमाड तिसरा व चौथा लोहमार्ग, दिल्ली - अंबाला तिसरा व चौथा लोहमार्ग या प्रकल्पांनाही मंजुरी दिली आहे. या वाढलेल्या रेल्वेमार्ग क्षमतेमुळे वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होईल, कार्यक्षमता वाढेल आणि भारतीय रेल्वेच्या सेवेची विश्वासार्हतादेखील वाढेल.
या बहुमार्गी प्रकल्पांचा उद्देश रेल्वेच्या कामात सुसूत्रता आणणे व वाहतूक कोंडी कमी करणे हा आहे. हे प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या भारताच्या संकल्पनेशी निगडित आहेत. या प्रकल्पांमुळे त्या भागात सर्वसमावेशक विकास होईल आणि नागरिक आत्मनिर्भर होतील तसेच रोजगार अथवा स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील. पीएम गती शक्ती राष्ट्रीय बृहद् आराखड्यानुसार या प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहे.
एकात्मिक आराखडा व संबंधितांशी सल्लामसलतीद्वारे बहुस्तरीय दळणवळण सुविधा आणि मालवाहतूक कार्यक्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. या प्रकल्पांमुळे नागरिक, वस्तू आणि सेवा यांच्या वाहतुकीसाठी सुलभ दळणवळण सुविधा उपलब्ध होईल. दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील १२ जिल्ह्यांमधील या तीन प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेमार्गाचा सध्याचा विस्तार ३८९ किलोमीटरने वाढेल. या प्रस्तावित बहुमार्गी प्रकल्पामुळे सुमारे ९७ लाख लोकसंख्या असलेल्या ३ हजार ९०२ गावांच्या संपर्क व्यवस्थेत सुधारणा होईल.
हे प्रस्तावित प्रकल्प कोळसा, पोलाद, लोहखनिज, सिमेंट, बॉक्साईट/चुनखडी, धान्य, साखर, खते, इंधन इत्यादी मालाच्या वाहतुकीसाठी गरजेचे आहेत. या प्रकल्पांमुळे प्रतिवर्ष ९६ दशलक्ष टन अतिरिक्त माल वाहतूक होऊ शकते.
या प्रस्तावित क्षमता वाढीमुळे देशातील अनेक प्रमुख पर्यटन स्थळांच्या रेल्वे संपर्क व्यवस्थेत सुधारणा होईल. भावली धरण, श्री घाटणदेवी, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, श्री माता वैष्णोदेवी कटरा/श्रीनगर यासह हम्पी, बेळ्ळारी किल्ला, दारोजी अस्वल अभयारण्य, तुंगभद्रा धरण, केंचनगुड्डा आणि विजया विठ्ठल मंदिर इत्यादी पर्यटन स्थळांचा यामध्ये समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.